अवघ्या महिन्याभरापूर्वीच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची चर्चा शांत होते न होते तोच पुन्हा एकदा जेएनयूमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी विद्यापीठातील स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चरल स्टडीजमध्ये भरलेल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये तीन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं JNU मध्ये?

जवळपास पाच वर्षांनंतर, अर्थात २०१९नंतर पहिल्यांदाच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघटना निवडणुका घेतल्या जात आहेत. काही दिवसांत या निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी जनरल बॉडी मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), ऑल इंडिया स्टुडेंट्स असोसिएशन (एआयएसए) आणि डाव्या विद्यार्थी संघटनेच्या इतर विद्यार्थी सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचे व्हिडीओ एएनआय व पीटीआय या वृत्तसंस्थांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर केले आहेत.

दोन्ही संघटनांचे एकमेकांवर आरोप

दरम्यान, अभाविप व एआयएसए या दोन्ही संघटनांनी सदर घटनेसाठी एकमेकांना दोष दिला आहे. “गुरुवारच्या बैठकीत अभाविपच्या गुंडांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. निवडणूक समितीसाठीच्या निवड प्रक्रियेत गोंधळ घालण्याचा त्यांनी आधी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी हाणामारी करायला सुरुवात केली. रॉडने सामान्य विद्यार्थ्यांना बेफामपणे मारहाण करण्यात आली”, असं एआयएसएकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. “जेव्हा एखादा मुस्लीम विद्यार्थी निवडणूक समितीसाठी नाव देतो, तेव्हा ते त्याला विरोध करतात”, असंही निवेदनात म्हटलं आहे.

तर दुसरीकडे अभाविपनं थेट विद्यार्थी संघटना अध्यक्ष आएशा घोष हिच्यावरच हिंसाचाराला सुरुवात केल्याचा आरोप केला आहे. “या गटानं पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर हल्ले करायला सुरुवात केली. घोष आणि तिच्या सहकाऱ्यांशी संबंधित हल्लेखोरांनी हिंसक हल्ले करायला सुरुवात केली. अपंग विद्यार्थ्यांनाही त्यांनी सोडलं नाही”, असा आरोप अभाविपनं केला आहे.