ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारवर टीका केली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हातळण्यास मोदी सरकार अपयशी ठरल्याच सिब्बल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेसंदर्भातील इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन राजकीय सभा आणि कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यास ज्यापद्धतीने परवानगी दिली त्यावरुन त्यांनी जगाला करोना परिस्थिती कशी हाताळू नये हे दाखवून दिल्याचा टोला सिब्बल यांनी लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिब्बल यांनी मोदी सरकारच्या करोनासंदर्भातील धोरणांवर टीका केली. इतकच नाही तर त्यांनी मोदींनी देशाची माफी मागवी असंही म्हटलं आहे. चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतीच निवडणूक पार पडली. यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दचेरीचा समावेश होता. येथे एप्रिलमध्ये निवडणुका पार पडल्या तर हरिद्वारमध्ये कुंभमेळा महिनाभर सुरु राहिला.

“करोनाची साथ संपली आहे असं केंद्र सरकारला वाटलं. वर्ल्ड इकनॉमिक फोरमने त्यांचं कौतुकही केलं. मात्र त्यावेळी त्यांना हे समजलं नाही की असा वेळ येऊ शकतो जेव्हा चाचण्या करण्यासाठी तसेच ऑक्सिजन मिळवण्यासाठीही लोकांना धडपड करावी लागेल. मार्च महिन्यामध्ये आपल्या भारतातील ९ प्रयोगशाळांनी करोनाचा नवा विषाणू हा देशामध्ये अधिक वेगाने पसरेल आणि नवीन संकट निर्माण होईल. असा इशारा दिला होता. मात्र असं असतानाही सरकारला आपण राजकीय सभा घेऊ शकतो आणि कुंभ मेळ्याचं आयोजन करु शकतो असं वाटलं. केंद्राने ज्याप्रकारे या करोना लाटेकडे दुर्लक्ष केलं त्यावरुन साथीच्या रोगाची परिस्थिती कशी हाताळू नये हे समजते. पंतप्रधान मोदींनी देशवासियांसमोर आलं पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे,” असं कपिल सिब्बल म्हणाले.

भारतामध्ये सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांपासून देशामध्ये रोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक नवे करोना रुग्ण आढळून येत आहेत. तसेच रोज तीन हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये ऑक्सिजन बेड्स, औषधे यासारख्या गोष्टींचा तुटवडा जाणवू लागलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi should apologise for mishandling of covid 19 says kapil sibal scsg