कोल्हापूर : देशात आणीबाणीच्या काळात जिल्ह्यात कारावास भोगावा लागलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ येथे बुधवारी लोकशाहीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आणीबाणीत लढा दिलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार स्वप्नील पवार, कारावास भोगलेले प्रभाकर गणपुले, प्रमोद जोशी, बाळासाहेब कांबळे, आनंदा पाटील, वसुंधरा मराठे, धोंडीराम पाटील, माधव देशिंगकर, महेश्वर महाबळ, वेंकटेश बिदनुर, अशोक फडणीस, स्वाती सखदेव, अरुण सोनाळकर, विद्याधर काकडे आदी उपस्थित होते.

आणीबाणीच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील १०६ व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगला होता. जिल्हाधिकारी येडगे यांनी मानधनासंदर्भात अडचणी संबंधित कक्षात नोंदविण्याचे आवाहन केले. मानधन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.