|| प्रबोध देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : लशीचा मात्रा घेऊन करोनापासून स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी सध्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड होत आहे. पश्चिाम विदर्भात लसीकरणासाठी प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार असल्याने नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शारीरिक अंतर नियमाचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे चित्र असून केंद्रांवरील प्रचंड गर्दीमुळे करोना संक्रमण अधिक वेगाने पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे लसीकरण केंद्र की समूह संक्रमणाची स्थळे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

पश्चिाम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून करोना संक्रमण झपाट्याने वाढले. रुग्णवाढीचा उच्चांक झाला असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठी वाढ नोंदविण्यात आली. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, प्राणवायू, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर आदींचा तुटवडा निर्माण झाला. करोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच लसीकरणाचाही वेग वाढविण्यात आला आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. लस घेण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी होईल, हे लक्षात घेऊन लसीकरण केंद्र, वेळ याची पूर्वनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, तरीही केंद्रांवरील गर्दी कमी झालेली नाही. मागणीच्या तुलनेत लशींचा पुरवठा अत्यल्प आहे. त्यामुळे मोजक्याच केंद्रांवर मर्यादित स्वरूपात लसीकरण सुरू आहे. पूर्वनोंदणीसाठी नागरिकांची चढाओढ असते. काही सेंकदामध्ये पुढील दिवसाच्या लसीकरणाचा कोटा पूर्ण भरतो. शहरी भागातील निवडक लसीकरण केंद्र सुरू असून ग्रामीण भागातील केंद्रावरील लसीकरण बंद पडले. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अल्प प्रमाणात मंदगतीने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. पश्चिाम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही स्थिती सारखीच आहे.

अकोला जिल्ह्याचा विचार केल्यास १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी शहरात केवळ पाच केंद्र कार्यान्वित आहेत. वाढते तापमान लक्षात घेता महापालिकेने लसीकरण केंद्र सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेक लसीकरण केंद्रे उशिरापर्यंत सुरूच होत नाही. नागरिक रांग लावून तात्कळत उभे असतात. लसीकरणासाठी पूर्व नोंदणी केल्यावर सुद्धा नागरिकांना लशीची मात्रा घेण्यासाठी दोन ते अडीच तास रांगेत उभे राहावे लागते. मग पूर्वनोंदणीचा उपयोग काय? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अद्याप लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी, या वयोगटातील ग्रामस्थांना लशीचा मात्रा घेण्यासाठी शहराकडेच धाव घ्यावी लागते. त्यामुळे गर्दीमध्ये आणखी वाढ झाली. लशींची संख्या मर्यादित असली तरी प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली असती किंवा पूर्वी सुरू असलेल्या सर्वच केंद्रावर लसीकरण करण्यात आले असते तर गर्दी विभागली गेली असती. वाढती लाभार्थी संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने केंद्राची संख्या वाढवण्याऐवजी कमी केली. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे करोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अकोला जिल्ह्यातील इतर काही केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठीही पूर्वनोंदणी आवश्यक आहे. असंख्य नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली. दुसऱ्या मात्रेसाठी पूर्वनोंदणीच होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत. पश्चिाम विदर्भातील संपूर्ण लसीकरण मोहीम ढेपाळल्याचे चित्र आहे.

खासगी केंद्र बंद

लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये शासकीयसोबतच खासगी लसीकरण केंद्रानासुद्धा परवानगी देण्यात आली. १ मेपासून अचानक लाभार्थ्यांची संख्या वाढली व लशींचा पुरवठा अनियमित झाला. खासगी केंद्रांमध्ये लशीच उपलब्ध नसल्याने ते केंद्र बंद पडले. पहिली मात्रा खासगी केंद्रात घेतलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा कुठे घ्यावी? असा प्रश्न निर्माण झाला. सरकारी केंद्रावर पूर्वनोंदणी होत नसल्याने लसीकरण नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे.

पश्चिाम विदर्भातील आतापर्यंतचे लसीकरण

जिल्हा                      संख्या

अकोला         –           २११५८४

अमरावती       –          ३१४२६८

बुलढाणा        –          २९३२७५

वाशीम           –        १६४६१३

यवतमाळ        –       २५९५१०

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unplanned management of vaccination in west vidarbha akp