मुंबई : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यंधत्व जोडप्यांना अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी केईएम रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होती. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. त्याचा फटका या केंद्राच्या कामाला बसला आहे. त्यामुळे कृत्रिम गर्भधारणा केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया रखडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

विवाहानंतर अनेक वर्षांनंतरही ज्या जोडप्यांना माता-पिता होण्याचे भाग्य लाभत नाही, अशी जोडपी बाळ व्हावे यासाठी बरेच प्रयत्न करतात. मात्र त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. अशा जोडप्यांसाठी कृत्रिम गर्भधारणा केंद्र वरदान ठरत असले तरी या केंद्रामधील उपचार आणि औषधांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. ही अडचण लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्यात येत आहे.

हेही वाचा…मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

यासाठी रुग्णालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिरुद्ध आणि डॉ. अंजली मालपानी या दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. या केंद्रासाठी दोन यंत्रे आणण्यात आली आहेत. तसेच आवश्यक साधनसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र आचारसंहितेमुळे खरेदी प्रक्रिया थंडावली आहे. कृत्रिम गर्भधारणा केंद्राचे कामही थंडावल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.