मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेली तज्ज्ञ समिती येत्या गुरुवारी ७ डिसेंबर रोजी जलाशयाची पाहणी करणार आहे. आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यामुळे जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करावा लागणार असून त्यामुळे शहर भागातील अनेक भागांत पाणीकपात, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : म्हाडा सोडतीचा सर्व्हर डाऊन, घराचा ताबा घेण्यासाठी आलेले विजेते हैराण

संपूर्ण दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चिघळला आहे. १३६ वर्षे जुने हे जलाशय १८८७ साली हॅंगिंग गार्डन म्हणजे फिरोजशाह मेहता उद्यानाच्या खाली बांधण्यात आले होते. मात्र या जलाशयाची पुनर्बाधणी केल्यास ३८९ झाडे बाधित होणार आहेत. तसेच उद्यानही सात वर्षे बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे या उद्यानाच्या पुनर्बाधणीला येथील रहिवाशांनी व पर्यावरणप्रेमी लोकांनी विरोध केला आहे. त्यामुळे या जलाशयाची पुनर्बाधणी करायची की दुरुस्ती करता येईल, असेही पर्याय चर्चेच येऊ लागले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री आणि दक्षिण मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नागरिकांची बैठकही बोलावली होती. तसेच नागरिकांची एक समितीही तयार केली होती. मात्र त्यातून काही तोडगा न निघाल्यामुळे पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात एक पुनर्विलोकन समिती गठित केली आहे. या समितीमध्ये आयआयटीच्या संचालकांनी नियुक्त केलेले तीन प्राध्यापक आणि महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी आहेत. या समितीला आपला निर्णय देण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला होता. ही तज्ज्ञ समितीमार्फत गुरुवारी दिनांक ७ डिसेंबर रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक २ ची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यामुळे जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिक्त करावा लागणार आहे. त्यामुळे शहर भागातील काही भागांत पाणीकपात तर काही भागात पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे.

गुरुवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी कप्पा रिक्त केल्याने, मुंबई शहरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील.

या भागांतील पाणीपुरवठा बंद

कफ परेड व आंबेडकर नगरमध्ये नियमित पाणीपुरवठय़ाची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत असते. याठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कुठे, किती पाणीकपात?

नरिमन पॉइंट व जी. डी. सोमाणी  – पाणीपुरवठय़ात ५० टक्के कपात

मिलिट्री झोनमधील पाणीपुरवठय़ात ३० टक्के कपात

गिरगाव, मुंबादेवी  पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात

पेडर रोड  पाणीपुरवठय़ात २० टक्के कपात

नाना चौक, ताडदेव, ग्रॅंट रोड  पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai water cut news water supply to be affected in the city zws