भगवानगडाच्या गादीआडून सुरू असलेले भाजपचे राजकारण थांबविले नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री हे ‘न्यायाचार्य’ आहेत, त्यांनीच पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा योग्य न्याय करण्याची अपेक्षा असल्याचे मुंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. महंतांना राजकारण करायचे असेल, तर त्यांनी पवित्र गादी सोडून राजकारणात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भगवानबाबांच्या समाधीच्या सुवर्ण महोत्सव सांगतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नुकतेच तेथे गेले होते. त्याच्या आदल्या दिवशी धनंजय मुंडेही भगवानगडावर दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेकीबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मुंडे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचीही तक्रार आहे. आपण लोकांना आवरले नसते, तर धनंजय मुंडे त्या दिवशी गडावरून जिवंत परत गेले नसते, असे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले आहे. या वादामुळे सध्या मराठवाडय़ात वातावरण तापले आहे. मुंडे यांनी भगवानगडावर आपली श्रद्धा असल्याचे सांगितले. मला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने आणि त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्यावरही मी दर्शनाला गेलो होतो. दर्शनासाठी आलेल्या भक्तांवर महंतांनी अन्याय करणे शोभत नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय दत्तप्रमाणे अन्य कैद्यांनाही ‘फलरे’ द्यावी
चित्रपट अभिनेता संजय दत्त याला नववर्षांच्या स्वागतासाठी १४ दिवस ‘संचित रजा (फलरे)’ देण्याचा निर्णय योग्य असल्यास अन्य कैद्यांना त्याचप्रमाणे रजा द्यावी, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली आहे. कोणी कितीही प्रभावशाली असला तरी सरकारच्या निर्णयप्रक्रियेत त्याला झुकते माप दिले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मग फलरेसाठी किती कैद्यांचे अर्ज किती काळ प्रलंबित आहेत, त्यावर संजय दत्तप्रमाणे तत्परतेने निर्णय का झाले नाही, याचे उत्तरद्यावे. संजय दत्तच्या रजेबाबत भाजप नेते विरोधी पक्षात असताना आवाज उठवीत होते. आता भाजप सरकारचे हे का सुरू आहे, असा प्रश्न केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop politics behind bhagwangad dhananjay munde