वर्धा, रोहिणी नक्षत्र चुकले. पुढे १५ दिवस डोळे आभाळाकडे, आभाळातून थेंब नाही, म्हणून डोळ्यातून अश्रू. अखेर तो आला. पण चांगलाच बरसला. कारण होत्याचे नव्हते करून गेला. बियाण्यांचे कोंब अकाली जमिनीत गाडल्या गेले. वरूण राजा बळीराजास आज रडवून गेला. खरीप हंगामातील काल रात्रीचा व आजचा पाऊस हाहाकार माजवून गेला आहे.

काल बुधवारी रात्रीपासून प्रथमच जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागली. चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यास दिलासा मिळाला. पण ही हजेरी वाट लावून गेली आहे, असे शेतकरी नेते व सोनेगावचे शेतकरी सतीश दाणी सांगतात. लगतच्या ९, १० गावात भिती देणारा पाऊस झाला आहे. यशोदा नदी तुडुंब भरली. २, ३ गावात तर ढगफुटी सारखी वृष्टी झाली. टाकळी दरणे ते अल्लीपूर हा मार्ग बंद पडला आहे. लावलेले बियाणे नुकतेच अंकुर सोडू लागले होते. पण इतका पाऊस १२ तासात झाला आहे की शेताचे तलाव झाल्याचे दिसून येते, असे सतीश दाणी रडवेल्या अवस्थेत सांगतात. असे कधी जून महिन्यात झाले नाही, असेही ते सांगतात.

जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार देवळी तालुक्यात डिगडोह येथे पूर आला आहे. या पुरात तीन व्यक्ती अडकल्या. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकास पाचारण करण्यात आले आहे.  हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर वाहतूक बंद पडली आहे. वर्धा ते राळेगाव रस्ता पुराच्या पाण्याने बंद झाला असून हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाचा जगाशी संपर्क तुटला आहे. आलमडोह येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच सोनेगाव येथे पुलावरून पाणी वाहत असल्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. धाम प्रकल्पतून कालव्याद्वारे विसर्ग सूरू झाला आहे.

अद्याप मनुष्य किंवा पशु हानी झाल्याची नोंद झालेली नाही. घरांची पडझड पण नाही. मात्र सावध राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे. नव्याने प्राप्त माहितीनुसार देवळीलगत डिगडोह येथे तीन शाळकरी मूले पुराच्या पाण्यात अडकली. ती माहिती मिळताच देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू घटनास्थळी पोहचली असून मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सूरू झाले आहेत.

देवळीचे आमदार राजेश बकाने हे म्हणतात की खरंच आभाळ कोसळले. पण पावसाळ्यात पूर व त्यामुळे येणारे संकट याची माहिती घेऊन तीन महिन्यांपूर्वीच दक्षता घेऊन रुंदीकरण व अन्य कामे केलीत. सध्या मुलांना वाचविण्याचे सूरू असलेले प्रयत्न बघत आहो. ते सुखरूप बाहेर पडल्यावर अन्य ठिकाणी जाणार. सोनेगाव व अन्य काही गावात घरात पुराचे पाणी शिरले. पण रस्ता बंद असल्याने सध्या जाता येत नाही. २४ तास लक्ष ठेवून रहावे अशी स्थिती आहे. अन्य गावातील माहिती घेत असून सर्व ती खबरदारी घेतल्या जात आहे.