भूषण वर्धेकर
महाराष्ट्रात स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर आणि १९९० नंतर अशा तीनही कालखंडात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली. त्याचे परिणाम समाजातील सगळ्याच जातींतील लोकांना भोगावे लागले. सध्या आपण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विचार करू. मराठा समाज कधीकाळी शेकडो, हजारो एकर जमिनींचा मालक होता. सत्ता, संस्थाने, वतने, जहागिरी हे सगळे त्याच्याकडे होते. पण खापर पणजोबांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींचे तुकडे होत होत आता खापर पणतूकडे किती जमीन आहे हे बघितले तर लक्षात येते की सर्वसामान्य मराठा समाजाला शेतीतून घर चालवण्याइतकेदेखील उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्याला शेतीधंदा सोडून खासगी नोकरीकडे लक्ष द्यावे लागले. ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्य मराठा समाजाकडे असलेल्या शेकडो एकर शेतजमिनी गेल्या आणि जेमतेम जमिनीचे तुकडे आताच्या बहुसंख्य सर्वसामान्य मराठा कुटुंबाच्या वाट्याला आले आहेत. पण याची चिकित्सा कोणीही करणार नाही. कारण राजकारणात समाजाचे प्रश्न मांडून फक्त डाव खेळला जातो, त्यांची कारणमीमांसा केली जात नाही. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कधीच कृती केली जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात तीन डझनच्या आसपास जिल्हे, ३५० पेक्षा जास्त तालुके आणि ४० हजारांपेक्षा जास्त गावे आहेत. या सगळ्या गाव, तालुके, जिल्हे वगैरेंच्या व्यवस्था पाहण्यासाठी ज्या काही मूलभूत यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत ते विधानसभेपर्यंत लोकांमधून निवडून आलेली राजकीय मंडळी. राजकीय वरदहस्त लाभलेला कुटुंबकबिला राजकारणात सुस्थापित झाला. महाराष्ट्रात राजकीय नेतेमंडळींनी आपापल्या फायद्यासाठी गावपाटीलकी ते आमदारकीपर्यंत स्थान मिळवले आणि सगळीकडे असा मराठा समाज प्रस्थापित झाला. कालांतराने कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसींच्या कोट्यातून बहुतांश मराठा समाज राजकारणात बस्तान बसवू लागला. या सगळ्या गोष्टींचा फायदा सर्वसामान्य मराठा समाजाला झालाच नाही. याचमुळे श्रीमंत आणि गरीब मराठा ही दरी वाढत गेली. उदाहरणार्थ कोणत्याही एखाद्या गावात एक तरी सधन मराठा असतो ज्याच्याकडे बागायती शेतीवाडी, जोडधंदे आहे. तर त्याच गावातील मराठा समाजातील कित्येक लोकांनी तुटपुंज्या शेतीवर भागणार नाही म्हणून शहराकडे नोकरीसाठी स्थलांतर केले. हाच स्थलांतरित मराठा समाज आर्थिक पातळीवर बऱ्यापैकी मागासलेला आहे. त्यातले काही कुणबी ओबीसी म्हणून लाभार्थी झाले. थोडक्यात राजकीय पातळीवर श्रीमंत मराठ्यांची मक्तेदारी वाढलेली असताना मात्र ओपन मराठा म्हणवून घेणाऱ्या बहुसंख्य गरिबांना त्याचा फायदा झाला नाही. विशेषतः २००० सालानंतर जन्मलेल्या गरीब मराठा तरुणांना महागड्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो आहे. हाच मराठा तरूण वर्ग सध्याच्या परिस्थितीत होरपळलेला आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maratha reservation issue the real struggle is between the established marathas and economically poor marathas asj