पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांत सत्ता संपादन करीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पंजाबमध्ये तीनचतुर्थाश जागा जिंकून आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. पंजाबची सत्ता गमाविण्याबरोबर अन्य चार राज्यांमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेसच्या भवितव्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्या लाटेत काँग्रेस, ममता बॅनर्जी, मायावती, एमआयएमचे ओवेसी आदींची धूळधाण उडाली. काँग्रेसला पंजाबची सत्ता गमवावी लागली.

उत्तर प्रदेशात ३७ वर्षांनंतर लागोपाठ दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा विक्रम भाजपने केला. गतवेळच्या तुलनेत भाजपच्या ५० पेक्षा अधिक जागा घटल्या असल्या तरी भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. २५० पेक्षा अधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे महत्त्व वाढणार आहे. भाजपने मोदी आणि योगी यांच्यावरच प्रचारात सारे लक्ष केंद्रित केले होते. लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने योगी हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत.

उत्तर प्रदेशच्या शेजारीच असलेल्या उत्तराखंडमध्ये ७० पैकी ४७ जागा जिंकून भाजपने सत्ता कायम राखली. पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलल्याने भाजपवर टीका झाली होती. काँग्रेसला यशाची अपेक्षा होती. पण पर्वतीय प्रदेशातील मतदारांनी भाजपलाच पुन्हा कौल दिला. सत्ता मिळाली तरी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा झालेला पराभव हा भाजपसाठी धक्कादायक ठरला. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचाही पराभव झाला.

आम आदमी पक्षाचे यश

दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सत्ता हस्तगत केली. ११७ पैकी ९२ जागा जिंकत आपने सर्व विरोधकांची दाणादाण उडविली. काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत येईल. दिल्लीत  अरिवद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपला लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये एकतर्फी यश मिळाले होते. दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांची सत्ता मिळाल्याने राष्ट्रीय पातळीवर पर्याय म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत पुढे येण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असेल. आपच्या नेत्यांनी तसे संकेतच पंजाबच्या विजयानंतर दिले.

तृणमूलला गोव्यात अपयश

पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी विजयाची हॅट्ट्रिक केल्यावर राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात सारी ताकद पणाला लावली होती. परंतु गोव्यात तृणमूल काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काही वर्षांपूर्वी  पंतप्रधानपदाची स्वप्ने बघणाऱ्या मायावती यांच्या बसपाचा उत्तर प्रदेशात पार धुव्वा उडाला. मायावती यांची हक्काची मतपेढी भाजपकडे वळल्याने बसपाचा जनाधारच आटला. ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा तर मिळाली नाहीच पण मुस्लीमबहुल मतदारसंघांत फार प्रभावही पाडता आलेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections five states bjp aam aadmi party mamata banerjee mayawati owaisi aimim akp