राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन (एनआरसी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मौन बाळगणं चिंताजनक असल्याचं राजकीय रणनितीकारआणि बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे (JDU) राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांच्या भूमिकेवर प्रशांत किशोर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे की, “जर सोनिया गांधी एनआरसीच्या मुद्यावर भूमिका जाहीर केली तर स्पष्टता येईल. आंदोलनांमध्ये सहभागी होणं कायदेशीर आणि वैध आहे. पण एनआरसीवर एकही स्टेटमेंट जारी न करणं माझ्या समजण्यापलीकडे आहे”.
“काँग्रेसचं शासन असणाऱ्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यात एनआरसी प्रक्रिया राबवली जाऊ नये असा आदेश सोनिया गांधी यांनी किंवा काँग्रेस कार्यकारी समितीने दिला पाहिजे,” असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे.
“जवळपास १० मुख्यमंत्र्यांनी ज्यामध्ये काँग्रेसचेही मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमच्या राज्यात एनआरसी प्रक्रिया राबवू देणार नाही असं जाहीर केलं आहे. प्रादेशिक पक्षांबद्दल बोलायचं गेल्यास नितीश कुमार, नवीन बाबू, ममतादीदी किंवा जगन मोहन रेड्डी हे मुख्यमंत्रीच पक्षाचे प्रमुख आहेत. काँग्रेसमध्ये मात्र मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेऊ शकत नाहीत. काँग्रेस कार्यकारिणी समितीकडे निर्णयाचे अधिकार आहेत,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे.
Prashant Kishor: Nobody needs to prove link between NPR and NRC, documents speak for themselves and they state that NPR is the first step of NRC. This debate is linked to Citizenship Amendment Bill of 2003,during which,it was defined that after NPR,if govt wishes, they can do NRC pic.twitter.com/2mYpGHl3yH
— ANI (@ANI) December 30, 2019
“सोनिया गांधी काँग्रेस-शासित राज्यांमध्ये एनआरसी प्रक्रिया रावबली जाणार नाही हे अधिकृतपणे जाहीर का करत नाही ?.” असा सवाल प्रशांत किशोर यांनी विचारला आहे. यावेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसकडे संधी असतानाही कायद्यात बदल का करण्यात आला नाही? अशी विचारणाही केली आहे.
“नागरिकत्व कायदा २००३ मध्ये करण्यात आला. २००३ ते २०१४ या काळात काँग्रेसची सत्ता होती. जर कायदा असंवैधानिक आहे तर त्यात बदल करण्याची संधी काँग्रेसकडे होती,” अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि एनआरसीचा काही संबंध नसल्याचा दावा फेटाळून लावला. “एनपीए आणि एनआरसी एकमेकांशी संबंधित हे कोणालाही सिद्ध करायची गरज नाही. कागदपत्रांवरुनच हे सिद्ध होत असून एनआरसीकरिता एनपीए पहिलं पाऊल आहे,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.