इशारा देऊनही मुझफ्फरनगरमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय दंगली रोखण्यात उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरल्याचा ठपका केंद्र सरकारने सोमवारी ठेवला. या धार्मिक दंगलींमुळे राज्यातील जनतेचा समाजवादी पक्षावरील विश्वास पूर्णपणे उडाला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी सोमवारी मुझफ्फरनगरचा दौरा केला. या वेळी बोलताना गृहराज्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने धार्मिक दंगलींबाबत इशारा दिलेला असतानाही अखिलेश यादव सरकारने त्याबाबत कोणतेही प्रतिबंधात्मक पाऊल उचलले नाही.
जातीय दंगली होण्याचा इशारा केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला दिला होता. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना त्याबाबतची कल्पनाही दिली होती. मात्र उत्तर प्रदेश सरकारने केंद्राच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय या इशाऱ्यानंतर महापंचायतीला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे असते, असे गृहराज्यमंत्री सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुझफ्फरनगरमधील दंगलीनंतर समाजवादी पक्षाच्या सरकारवरून विश्वास उडाल्याचे नागरिकांनी पंतप्रधानांना सांगितल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
हिंसाचार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याची सर्वोच्च न्यायालयात माहिती
मुझफ्फरनगरमधील धार्मिक दंगल रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच दंगल पीडितांना सर्व प्रकारची मदत दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली; तर दंगलग्रस्त भागात केंद्रीय सशस्र पोलीस दलाच्या ७८ तुकडय़ा तैनात करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने मुख्य न्या. पी. सतशिवम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर दिली.
दंगलग्रस्त जिल्ह्य़ातील मदत आणि पुनर्वसनाचे काम योग्य पद्धतीने करण्याबाबत निर्देश देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारकडून माहिती मागविली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने आपापली माहिती न्यायालयासमोर मांडली.
दंगलीतील मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून दोन लाख रुपये, तर राज्य सरकारने १० लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती केंद्राने दिली.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या दंगलीत ४४ जणांचा बळी गेला, तर ९७ जण जखमी झाले असून दोन हजार ४६२ जणांना अटक करण्यात आल्याचेही केंद्राने न्यायालयात सांगितले. दंगलीचा ४१ हजार ८२९ जणांना फटका बसल्याचेही न्यायालयाला सांगितले.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका
नवी दिल्ली : धार्मिक दंगलीनंतर मुझफ्फरनगरचा दौरा करणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांचा हा धर्मनिरपेक्ष दौरा म्हणजे एक प्रकारचे नाटक असून त्याचा कोणताही राजकीय लाभ त्यांना मिळणार नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी सोमवारी केली. दरम्यान, दंगलग्रस्त मुझफ्फरनगरमधील संचारबंदी सोमवारी उठवण्यात आली आहे. मुझफ्फरनगरच्या दौऱ्यावर पंतप्रधानांसह यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आदी नेते आल्यानंतर राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यूपीएला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानेही पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका केली. निवडणुका जवळ आल्यामुळे पंतप्रधानांनी दौरा केल्याचे म्हटले आहे.
भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले की, धार्मिक दंगलीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी धर्मनिरपेक्ष दौरा काढला आहे. मात्र या दौऱ्यामुळे दंगलीतील मृतांना कोणताही फायदा मिळणार नाही, तसेच दंगलीतील पीडितांच्या जखमा भरून निघणार नाहीत, असेही नक्वी यांनी म्हटले.बसपच्या प्रमुख मायावती यांनीदेखील पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या दंगलीनंतर केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे आणि राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा पंतप्रधानांचा दौरा म्हणजे एक प्रकारचे नाटक ठरेल, अशी टीका मायावती यांनी केली.
केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला असता तर मुझफ्फरनगरची दुर्घटना टळली असती, असे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी म्हटले. दरम्यान, सोमवारी दंगलग्रस्त भागातील संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दंगलपीडितांचा घरी जाण्यास नकार
मुझफ्फरनगर : दंगलीत केवळ जीव वाचवून पळालो. बाकी सारे काही गमावून बसल्याचे दु:ख मुझफ्फरनगरमधील धार्मिक दंगलीतील पीडितांनी व्यक्त केले. सारे काही संपलेले असताना आता घरी जाऊन करायचे काय, असा आर्त सवाल करीत मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या एका दंगलपीडित मेहराज या युवकाने केला. या दंगलीनंतर बेघर झालेल्या अनेकांनी अशा प्रकारची व्यथा मांडून दंगलीची दाहकता दाखवून दिली.
दंगलीनंतर खेडीपत्ती, कुटबा-कुटबी, दुल्हेरा, किरथार, खराड, बावडी, सिसौली, मारवाडा, नावद, बदेह, किलोरी गावांतील नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. या छावण्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी सोमवारी भेट देऊन दंगलपीडितांची विचारपूस केली. बासिकलन येथील मदरसा आणि तावली येथील इस्लामिया शाळेत दंगलपीडितांनी आश्रय घेतला आहे.