कराड: कराड नगरपालिकेच्या नगररचना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्यातील पाच अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांची गाढवावरून धिंडही काढू असा यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी दिलेला धक्कादायक इशारा फलश्रुतीस गेला. यशवंत विकास आघाडीची मागणी गांभीर्याने घेवून पालिकचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने इशारा दिलेले आंदोलन स्थगित झाले. पण, इशाराकर्त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचा फलक बांधलेले चक्क गाढव पालिका परिसरात आणल्याने उपस्थित आचंबित झाले तर, कराडकरांमध्ये खळबळ उडाली.

कराड नगरपालिकेच्या नगररचना कार्यालयातील अधिकारी माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे मिळवणाऱ्यांशी लागेबांधे ठेवून संबंधितांच्या मागे पैश्यासाठी ससेमिरा लावणारी साखळी बनली असल्याचा आरोप करताना त्याचे पुरावे असल्याचा दावा राजेंद्र यादव यांनी केला होता. यासंदर्भात काल मंगळवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज बुधवारी सायंकाळपर्यंत आपले आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली होती. अन्यथा नगरपालिकेलाच टाळे ठोकू, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांची गाढवावरून धिंडही काढू असा धक्कादायक इशारा गटनेते राजेंद्र यादव यांनी दिला होता.

हेही वाचा : सातारा: मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष, कोयना खोऱ्यातील जमीन खरेदीबाबत मत व्यक्त करण्याची पर्यावरण कार्यकर्त्यांची अपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या राजेंद्र यादव यांनी काल मंगळवारी सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेवून खळबळ उडवून दिली होती. माजी नगराध्यक्ष संगिता देसाई, हणमंत पवार, विजय वाटेगावकर आदी उपस्थित होते. आज शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, यादव गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना काळे फासून गाढवावरून धिंड काढण्यासाठी प्रत्यक्ष गाढव घेवून नगरपालिकेत आंदोलनासाठी दाखल झाले. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी राजेंद्र यादव, हणमंत पवार, किरण पाटील, सुधीर एकांडे, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

याप्रकरणाची मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दाखल घेत नगररचना विभागातील दोघांना बडतर्फ केले. एकाची बदली केली. तर राजपत्रित दोन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार निवेदन सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांना पाठवले आहे. हे दोन्ही अधिकारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत. आंदोलनाला यश आल्याने हे धक्कादायक आंदोलन स्थगित करण्यात आले.

हेही वाचा : जतमधील माजी नगरसेवक खून प्रकरणातील मुख्य संशयित उमेश सावंत १४ महिन्यानंतर न्यायालयात हजर

दरम्यान, आंदोलनाला सुरुवात करण्याआधी मुख्याधिकारी खंदारे यांनी राजेंद्र यादव यांना चर्चेसाठी बोलावल्याने सर्वजण त्यांच्या दालनात गेले. यावेळी मुख्याधिकारी खंदारे यांनी यादव यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे आपल्या अधिकारात बसेल अशी कारवाई केली असल्याचे सांगितले. त्यानंतर राजेंद्र यादव यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.

राजेंद्र यादव म्हणाले, नगररचना विभागातील स्वानंद शिरगुप्पे व सचिन पवार यांच्यावर कारवाईचा अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे नसल्याने त्यांचे तक्रार निवेदन नगररचना विभाग सातारा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले आहे. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत तात्पुरती नियुक्ती असणारे रणजित वाडकर व शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ निलेश तडाखे यांना तातडीने तात्पुरते कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्याधिकारी खंदारे यांनी दिले. दोन्ही अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत तोंडी सूचना दिल्या होत्या. तरीही आपल्या वर्तनात बदल झाला नाही. यशवंत विकास आघाडीने तक्रार दाखल केल्याने दोघांनाही तात्पुरते सेवा कार्यातून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत. तर नगरपालिका आस्थापनेवरील वामन संतोष शिंदे यांची बांधकाम विभागातून यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये बदली करण्यात आली आहे. राजपत्रित दोन्ही अधिकारी अगोदर वैद्यकीय रजेवर गेले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी खंदारे यांनी दिली.

हेही वाचा : ….अन् राजवीचा तिसरा वाढदिवस अखेरचा ठरला

राजेंद्र यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यशवंत आघाडीतर्फे निवेदन दिले होते. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नगररचना विभागातील दोन राजपत्रित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन चार जूननंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पालिकेतील अन्य विभागांबाबतही तक्रार असून पालिकेची खातेनिहाय चौकशी व लेखा परीक्षणाची मागणी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे यशवंत विकास आघाडीने केली आहे. आम्ही केलेल्या मागण्यांवर तातडीने कारवाई झाल्याने टाळे ठोको आंदोलन स्थगित केले आहे. तसेच जोपर्यंत पालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची किड थांबत नाही, तोपर्यंत लढा देत राहणार असल्याचा निर्वाळा यादव यांनी दिला आहे.