मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे गडकिल्ले संवर्धन आणि देखभाल-दुरूस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत, अशी विनंती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या बलाढ्य इतिहासाची साक्ष देणारे राज्यातील ५४ गडकिल्ले केंद्रीय पुरातत्व विभागाकडे असून ६२ गड किल्ले राज्य सरकारकडे आहेत. केंद्राच्या अखत्यारित असलेले किल्लेही राज्य शासनाकडे दिल्यास त्यांची डागडुजी व देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल. यासाठी हे किल्ले राज्य शासनाकडे देण्यात यावेत, अशी विनंती ॲड. शेलार यांनी पत्रातून केली आहे.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत राज्यातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी राज्य शासनातर्फे मंत्री शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसला शिष्टमंडळ गेले होते. या १२ किल्ल्यांच्या यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय हे वारसा संवर्धनातील विशेष तज्ज्ञ व वास्तुविशारदांच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम प्रभावीपणे करू शकते. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासन काम करीत असून, काही खाजगी संस्थांकडून सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीही उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे इतिहासाची साक्ष देणारे किल्ले जतन करणे, हे आमचे कर्तव्य असल्याचे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar letter to union minister demanded to handed over forts in maharashtra to state government zws