मुंबई : विकासाच्या मार्गात कोणालाही अडथळा आणू देणार नाही. टक्केवारीसाठी प्रकल्पांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी खडसावले. प्रकल्पांमध्ये लोकप्रतिनिधी अडथळे आणत असतील, तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी आणि अधिकारी अडथळे आणत असतील, तर लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणावे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी विकासाचे ध्येय ठेवून काम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले, तर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण केंद्र येथील कार्यक्रमात करण्यात आले.  यावेळी फडणवीस म्हणाले, आपल्याला दोन वर्षांत बदल करून दाखवायचा आहे. चांगल्या कामाव्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही अपेक्षा नाहीत. विकासाला प्राधान्य असून त्यातून रोजगार निर्मिती होईल व नवीन तंत्रज्ञानाला वाव मिळेल. राज्यात शहरीकरण वेगाने होत असून ते आपण थांबवू शकत नाही. सुनियोजित शहरांसाठी धोरण नसल्याने शहरे बकाल झाली. पिण्याचे पाणी, कचरा व सांडपाणी विषयक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. महाराष्ट्र २०१७ मध्ये हागणदारी मुक्त झाला आहे. स्वच्छ राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला २०१८ मध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे.

आता छोटय़ा शहरांचाही समावेश या योजनेत झाल्याने राज्यातील ५१२ शहरांसाठी पुरेसा निधी आहे. त्यात खासगी गुंतवणूकही आणली जात असून नागपूरला प्रयोग केला आहे. सांडपाण्यावर  प्रक्रिया करून वीज निर्मिती केली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont block projects percentage devendra fadnavis officials people representatives development ysh
First published on: 01-10-2022 at 01:23 IST