नाशिक – राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत आगामी शैक्षणिक वर्षापासून केवळ इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. बालभारती आणि राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र मंडळाचे अस्तित्व नेहमीप्रमाणे कायम राहील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीएसई अभ्यासक्रमाविषयी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधील गैरसमज सभागृहात आणि पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती मांडून दूर केले जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा झाल्यानंतर काही समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. मुळात, २०२५-२६ शैक्षणिक वर्षात केवळ इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई पद्धत लागू केली जाईल. म्हणजे त्या अभ्यासकमातील चांगल्या गोष्टी पाठ्यक्रमात समाविष्ट केल्या जातील. काहींना बालभारती आणि राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र मंडळाच्या (एसएससी बोर्ड) अस्तित्वाविषयी संभ्रम वाटतो. परंतु, त्यांचे अस्तित्व पूर्वी होते, तसेच कायम राहणार आहे. सविस्तर माहिती मांडल्यानंतर सर्वांचे गैरसमज दूर होऊन या निर्णयाचे स्वागत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षक भरतीची दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. जिल्हा परिषदेसह अन्य संस्थांकडून बिंदू नामावली, कागदपत्र पूर्ततेला वेळ लागत असल्याने मुदतवाढ देण्यात आली. आठ दिवसात भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असेही भुसे यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada bhuse assures that the existence of the state education board along with bal bharati will continue amy