-
भारताची वास्तुकला ही केवळ दगड आणि विटांची रचना नाही, तर ती शतकानुशतकांची सांस्कृतिक, धार्मिक आणि कलात्मक परंपरा जपणारी एक जिवंत कथा आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये वैभव, राजेशाही आणि युरोपीय स्थापत्यकलेचा संगम पाहायला मिळतो, तर अडालजची बावडी (विहीर) पाहताना तुम्हाला सूक्ष्म कोरीवकाम आणि जलसंवर्धनाची प्राचीन भारतीय पद्धत पाहायला मिळेल. अशा असंख्य वास्तू भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला त्या त्या काळातील समाजजीवन, श्रद्धा आणि सौंदर्यदृष्टीची झलक दर्शवतात. म्हणूनच भारतीय वास्तुकला ही जगभरातील अभ्यासक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही वास्तूकलेची उत्तम उदाहरणं दाखवणार आहोत. (Photo Source : Wikimedia commons)
-
अडालजची बावडी (Stepwell)
अहमदाबादजवळ १५व्या शतकात ही विहीर बांधण्यात आली. याचं बांधकाम राणी रुदाबाई यांनी त्यांचे पती राजा वीरसिंह यांच्या स्मरणार्थ केलं. या बावडीत एकूण पाच मजले असून प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक पायरीवर अप्रतिम कोरीवकाम करण्यात आलं आहे. ही बावडी केवळ पाणी साठवण्यासाठीच नव्हे, तर यात्रेकरूंना विसाव्याचं ठिकाण म्हणून विकसित केली होती. हिंदू आणि इस्लामी स्थापत्यशैलीचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. (Photo Source : Wikimedia commons) -
लक्ष्मी विलास पॅलेस, वडोदरा
वडोदऱ्यातील लक्ष्मी विलास पॅलेस हा भारतातील नव्हे तर जगातील सर्वात वैभवशाली राजवाड्यांपैकी एक आहे. याचं बांधकाम १८९० साली महाराजा सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी करवून घेतलं होतं. या राजवाड्याची रचना इंडो-सरासेनिक स्थापत्यशैलीची असून युरोपीय डिझाइनचा प्रभावही दिसतो. राजवाड्यात शस्त्रसंग्रहालय, दरबार हॉल आणि विशाल बागा आहेत. आजही हा राजवाडा गायकवाड घराण्याचं निवासस्थान आहे आणि पर्यटकांसाठी खुला आहे. हा राजवाडा बर्किंगहॅम पॅलेसपेक्षा अनेक पटींनी मोठा आहे. (Photo Source : Wikimedia commons) -
बडा इमामवाडा, लखनौ
लखनौतील बडा इमामवाडा १७८४ साली नवाब आसफ-उद-दौला यांनी बांधला आहे. हे धार्मिक संकुल शिया मुसलमानांच्या मुहर्रम उत्सवाशी संबंधित आहे. या इमारतीचं मुख्य आकर्षण म्हणजेच याची भूलभुलैया (गोंधळवून टाकणारे मार्ग) रचना. संपूर्ण बांधकामात लोखंडाचा वापर न करता केवळ चुन्याच्या मिश्रणाने भिंती बांधल्या आहेत. बडा इमामवाडा हे लखनौच्या नवाबी वैभवाचं प्रतीक मानलं जातं. (Photo Source : Wikimedia commons) -
चांद बावडी
चांद बावडी ही राजस्थानातील आबानेरी गावात असलेली भारतातील सर्वात जुनी आणि आकर्षक विहीर आहे. ही बावडी इ.स. ८ व्या-९व्या शतकात राजा चांद यांनी बांधली असल्याचे मानले जाते. यामध्ये तब्बल ३,५०० पायऱ्यां आहेत. ही बावडी १३ मजली खोल आहे. पूर्वी ती पाण्याचा साठा आणि उष्ण प्रदेशात थंडावा मिळवण्यासाठी वापरली जात असे. आज ती राजस्थानच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा आणि अभियांत्रिकी कौशल्याचा एक अद्वितीय नमुना मानली जाते.(Photo Source : Wikimedia commons) -
इबादतखाना, फतेहपूर सिक्री :
इबादतखाना हा फतेहपूर सिक्री येथे बादशहा अकबराने इ.स. १५७५ मध्ये बांधलेलं एक विशेष सभागृह आहे. येथे अकबर विविध धर्मांच्या विद्वानांना एकत्र आणून धर्म, तत्त्वज्ञान आणि नैतिकतेवर चर्चा करत असे. या ठिकाणी इस्लाम, हिंदू, ख्रिश्चन आणि पारशी धर्मगुरूंमध्ये संवाद होत असे, ज्यातून अकबराच्या सुलह-कुल (सर्वधर्मसमभाव) या तत्त्वज्ञानाची कल्पना उदयास आली. इबादतखाना हे त्याच्या उदार आणि प्रगत विचारांचे प्रतीक आहे.(Photo Source : Wikimedia commons) -
लेपाक्षी मंदिर
लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात स्थित आहे आणि हे १६ व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले. हे मंदिर भगवान वीरभद्रांना समर्पित असून त्याची उत्कृष्ट शिल्पकला आणि भित्तिचित्रे प्रसिद्ध आहेत. येथे नंदीचे विशाल पाषाणशिल्प आणि छतावर रामायणातील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या छताला आधार देणाऱ्या खांबांपैकी एक खांब जमिनीपासून थोडा उचललेला आहे, जो अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. लेपाक्षी मंदिर हे दक्षिण भारतीय द्रविड वास्तुकलेचे एक अद्वितीय उदाहरण आहे.(Photo Source : Wikimedia commons)
वास्तूकलेच्या बाबतीत भारत म्हणजे केवळ ताजमहाल नव्हे, पाहा देशातील सहा वास्तुशिल्प चमत्कार
गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये वैभव, राजेशाही आणि युरोपीय स्थापत्यकलेचा संगम पाहायला मिळतो, तर अडालजची बावडी (विहीर) पाहताना तुम्हाला सूक्ष्म कोरीवकाम आणि जलसंवर्धनाची प्राचीन भारतीय पद्धत पाहायला मिळेल.
Web Title: Architectural marvels in india beyond taj mahal laxmi vilas palace to lepakshi temple iehd import asc