सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : कापूस आणि सोयाबीनचे घसरलेले भाव त्यामुळे मेटाकुटीला आलेले, बेरोजगारीमुळे गावोगावी भेटणारे शेकडो तरुण , न परवाडणारे शैक्षणिक शुल्क, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून न होणारी भरती, भरती प्रक्रियेतील अनागोंदी हे प्रश्न तर आहेतच. पण त्याप्रश्नातून जन्माला येणारा भाजपविषयीचा राग मराठवाड्यात खूप अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचे निरीक्षण राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना नोंदविले. विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत मराठवाड्यातून युवा संघर्ष यात्रा जात असताना राेहित पवार यांच्याशी विविध प्रश्नावर बोलते झाले.

युवा संघर्ष यात्रेचा मराठवाड्यातील अनुभव कसा होता, कोणते प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटले ?

पुणे – नगर आणि माझा मतदारसंघाच्या भागातून बीड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यातून आता यात्रा जात असताना अनेकांशी चर्चा होत आहे. गावोगावी शिकलेल्या मुलांच्या हाताला काम नाही. कुणीची चहाची टपरी सुरू केली आहे. पण अनेकजण नोकरी मिळेल या आशेवर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यांना शुल्क परवडत नाही. जी मुले शिकत आहेत, त्यांच्या शेतकरी वडिलांची अवस्था अधिक वाईट आहे. कापसाला भाव नाही, त्यातून तो आता भिजला आहे. सोयाबीनचे दर घसरलेले आहेत. पीक विम्याच्या गेल्या वर्षीची रक्कम मिळाली नाही, अग्रीम रक्कम मिळावी म्हणून आंदोलने सुरू आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णत: ठप्प झाली आहे. एका अर्थाने राज्य सरकारचे कामकाज पूर्णत: ठप्प आहे. इंग्रजीत ज्याला आपण ‘सिस्टम फेल्युर’ म्हणतो तशी परिस्थिती आहे.

हेही वाचा… मराठवाड्यात ‘खान की बाण’, ‘मराठा- ओबीसी’ प्रारुप विस्तारणार ?

या प्रश्नांच्या आधारे राजकीय मत बनेल असे वाटते का ‌?

राज्य शासन नावाची यंत्रणाच अपयशी ठरत असल्याची मानसिकता संपूर्ण मराठवाड्यात दिसून येत आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अधिकारी फक्त मंत्र्यासमोर माना डोलावतात. त्यांचीही कामे किती करतात हे माहीत नाही. आमदारांचे मतही ऐकून घेतले नाहीत. नोकरशाहीवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. असे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही. त्यामुळे सरकार विषयी नाराजी आहे. पण ही नाराजी सत्तेमधील प्रमूख भाजपविषयीचा अधिक आहे. अन्य पक्षांवरील नाराजीपेक्षाही सत्तेतील प्रमुख पक्षाचे नाकर्तेपण आता तरुण सांगू लागले आहेत.

हेही वाचा… श्रीशिवपुराण कथा सोहळा आयोजनातून मतपेरणी, पालकमंत्री दादा भुसे यांचा पुढाकार

युवा संघर्ष यात्रेतील प्रश्न जरी सामाजिक असले तरी त्याचे राजकीय परिणाम असतात. युवा संघर्ष यात्रेतून राष्ट्रवादीची बांधणी होत आहे का ?

या यात्रेचा तसा विचार केलेला नाही. पूर्वीपासून जे कार्यकर्ते जोडलेले आहेत, ते यात्रेत सहभागी होत आहेत. दरवेळी हजारो जणांची गर्दी व्हावी, त्यातून शक्तीप्रदर्शन व्हावे, असे यात्रेतून अपेक्षित नव्हतेच. पण तरीही खूप कार्यकर्ते गर्दी करत आहेत. पण जिथे कमी गर्दी असते तिथे अधिक प्रभावी संवाद होतो आहे. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांशी संवाद साधता आला. तरुण मुलांशी तर बोलतो आहोतच. तरुणांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये सत्ताधारी आणि विशेषत: भाजप विषयीचा रोष अधिक असल्याचे दिसून येत आहे. आपला राजकीय स्वार्थ व्हावा म्हणून मराठा – ओबीसीमध्ये सरकार भांडणे लावत आहे, ही भावना सर्वत्र आहे. आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, ही भावना पर्याय शोधेल, असे वाटते आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of mla rohit pawar about yuva sangharsh yatra print politics news asj