बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये बेकायदा जीन्स धुलाई कारखान्यांचे मोठे जाळे पसरल्याची बाब लोकसत्ताने विविध वृत्तांमधून समोर आणली आहे. ग्रामीण भागातल्या शेती, प्राणी पक्षी यांनाही या धुलाई कारखान्यांचा त्रास होऊ लागला आहे. कल्याण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदे द्रुतगती महामार्ग शेजारी रायते आणि घोटसई गावांच्या वेशीवर एक जीन्स धुलाई कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची बाब स्थानिकांनी उघडली आणली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित होते आहे. तर शेतीलाही त्याचा धोका निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर शहरातून हद्दपार करण्यात आलेले जीन्स धुलाई कारखाने कालांतराने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड या तालुक्यांमध्ये नदीकिनारी विस्थापित झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अधिकृतपणे जीन्स धुलाई कारखाना सुरू करायचा असल्यास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करण्यात आला. मात्र हा खर्चिक त्रास नको म्हणून जीन्स धुलाई कारखान्यांच्या मालकांनी बेकायदा पद्धतीने ग्रामीण भागात कारखाने सुरू केले. आज हेच कारखाने उघडपणे कोणतीही प्रक्रिया न करता जीन्स धुलाईचे सांडपाणी थेट नैसर्गिक नाले आणि नदीपात्रात सोडत आहेत. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

अनेक कारखानदार खड्डे खोदून त्यात हे सांडपाणी मुरवत आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा दूषित होतो आहेकल्याण तालुक्यातील कल्याण अहिल्यानगर राज्य मार्गावर आणि नव्याने उभारण्यात येत असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदे द्रुतगती महामार्ग शेजारी अशाच प्रकारे एक कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. गोवेली टिटवाळा रस्त्यावर सीएनजी पंप समोरच काही अंतरावर हा कारखाना असून या कारखान्यातून सांडपाणी नैसर्गिक नाल्यात सोडले जाते आहे. पुढे एका बंधाऱ्यात हे सांडपाणी अडत असून तेथे दुर्गंधी पसरली आहे. काही वर्षांपूर्वी जंगली प्राणी पक्षी या नैसर्गिक नाल्यावर पाण्यासाठी अवलंबून होते. मात्र आता हे पाणी दूषित झाल्याने प्राणी पक्षांनाही याचा त्रास होतो आहे. हेच सांडपाणी पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते आहे.

जलपर्णी वाढलेलीच

उल्हास नदीत नागरी सांडपाणी मिसळत असल्याने उल्हास नदीचे प्रदूषण वाढले आहे. सध्याच्या घडीला नदीवर अनेक किलोमीटर पर्यंत जलपर्णीचे आच्छादन आहे. त्यामुळे पाणी पातळी घटते आहे. त्यावर अजूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह अनेक पालिकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बेकायदा जीन्स जुलाई कारखाने मात्र थांबताना दिसत नाहीत.

कारवाई करणार

या जीन्स धुलाई कारखान्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या कार्यालयाशी संपर्क केला असता असा कारखाना सुरू असल्यास तातडीने तिथे पाहणी करून कारवाई केली जाईल. येथील नमुने घेतले जातील अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी यू कुलकर्णी यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane jeans washing factories along the highway local agriculture in danger even animals and birds do not get drinkable water ssb