कोल्हापूर: करवीरचे आमदार पी. एन . पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्ष नेतृत्वाला धक्का बसला आहे . काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, आमदार पाटील यांच्याशी ५० वर्षांची मैत्री असलेले गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

पालकमंत्र्यांच्या भावना

ध्येयवेड्या, तत्त्वनिष्ठ आणि निष्ठावंत नेतृत्वाला मुकलो, अशा भावना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हेनिस- ईटली येथून व्यक्त केल्या. ते म्हणाले, माझे सच्चे आणि परममित्र माननीय आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची बातमी आम्हाला परदेशामध्ये कळली आणि मला तर धक्काच बसला. गेले चार दिवस मी त्यांना अधिकच्या उपचारासाठी मुंबई किंवा परदेशात हलविण्यासंदर्भात दररोज हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी आणि त्यांच्या जवळच्या संबंधित व्यक्तींशी विचारपूस करत होतो. त्यादृष्टीने हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती. त्यामुळे, आम्हा सर्वांनाच वाटत होते की ते एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाणार नाहीत. शेवटी काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आम्हा सर्वांना ते सोडून गेले.

हेही वाचा: आमदार पी. एन. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू , शासकीय इतमामात अंत्यविधी होणार

पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कै. श्री. पी. एन. पाटील हे माझे सच्चे स्नेही होते. संपूर्ण हयातवर ते काँग्रेसच्या विचारांचा पाईक म्हणून काँग्रेसशी निष्ठावंत राहिले. मी तर कधी -कधी त्यांना विनोदाने म्हणायचो, एखाद्यावेळी जग इकडचे तिकडे होईल. परंतु आमदार पी. एन. पाटील संपूर्ण आयुष्यभर काँग्रेस पक्षाचीच पाठराखण करतील. अशा एका ध्येयवेड्या, संपूर्ण आयुष्यभर तत्वांशी इमानदार रहाणाऱ्या नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. एखादा निर्णय एकदा घेतला की त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही. तो निर्णय निभावणारा असा एक सच्चा मित्र आज आमच्यातून निघून गेला. ही पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. १९८४-८५ साली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात आमचा दोघांचाही संचालक म्हणून एकत्र प्रवेश झाला. त्यावेळीपासून आजतागायत म्हणजे गेली ४० वर्षे आमची मैत्री अतूट राहिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार, समाजकारण आणि राजकारणामध्ये आम्ही अनेकवेळा एकत्र होतो. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधातही होतो. त्याचा कधीही आणि कोणताही परिणाम आमच्या मैत्रीवर पडला नाही.

मुश्रीफ पुढे म्हणाले, उद्याच आम्ही परदेशातून निघून त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देऊन दिलासा देणार आहोत. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातून सावरण्याची हिंमत आणि शक्ती परमेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

हेही वाचा:मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस

काँग्रेसचे अतोनात नुकसान – सतेज पाटील

विदेशात असलेले कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पीएन पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळं काँग्रेसचं मोठं नुकसान झालं. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचं बळ देवो.

हेही वाचा: आमदार पी. एन. पाटील यांना अधिकच्या उपचारांसाठी मुंबईला हलविता येईल काय?; हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा

अर्धशतकाची मैत्री नीमाली – अरुण नरके

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी ‘ मनपा ‘ नावाचा फॅक्टर अत्यंत सक्रिय होता. आमदार महादेवराव महाडिक, गोकुळचे अध्यक्ष अरुण नरके आणि आमदार पी. एन. पाटील अशी ती त्रयी होती. आमदार पाटील यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना अरुण नरके म्हणाले, जनमाणसातील दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे पी. एन. पाटील. दिलेला शब्द पाळणारा राजा माणूस. कार्यकर्त्यांचा पाठीराखा. सहकारी संस्था उत्कृष्टपणे चालवणारा. काँग्रेसचा अभिमान असणारा. राजीव गांधी व त्यांच्या परिवारावर नितांत प्रेम करणारा.तसेच कोल्हापुरात राजीव गांधींचा पुतळा उभा करणारा व विलासराव देशमुखांचा उजवा हात म्हणून खास ओळख असणारा. निष्ठा म्हणजे काय असते हे जगाला दाखवून देणारा… जीवाला जीव देणारा माझा उत्कृष्ट मार्गदर्शक. ४८ वर्षांची प्रदीर्घ घट्ट मैत्री असणारा माझा मित्र पी.एन आज आमच्यातून निघून गेला.