कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बारावीप्रमाणेच कोल्हापूर केंद्र राज्यात दुसऱ्या स्थानी राहिले आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९६.८७ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी ०.५८ टक्के कमी निकाल लागला आहे.

यंदाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५२ हजार ३९४ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यातील ३८ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार ९८९ इतकी आहे. सातारा जिल्ह्यात ३७ हजार २०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ३५ हजार ९९७ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शंभर नंबरी सोने

कोल्हापूर विभागातील १११४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये अव्वल स्थानी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ५००, सातारा जिल्ह्यातील ३५७ तर सांगली जिल्ह्यातील २५७ शाळांचा समावेश आहे. या परीक्षेत कॉपीचे एकही प्रकरण आढळलेले नाही. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकारांना सांगितले.