महायुती सरकारमध्ये विरोधी बाकावर असणारे अजित पवार सत्तेत सामिल झाल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राष्ट्रवादीत फूट पाडून काही आमदारांना त्यांनी मंत्रिपदेही दिली. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी नेमकी कोणाची यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले तरीही शरद पवार आणि अजित पवार गटाने यावर आपला दावा ठोकला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीत आले तर आपलं महत्त्व कमी होईल, अशी स्पष्ट कबुली अजित पवारांनी दिली आहे. पुढारी न्युजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती!

देवेंद्र फडणवीस योग्य व्यक्ती आहेत, पण ते चुकीच्या पक्षात आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीत घ्यावं असं वाटलं नाही का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी तत्काळ उत्तर दिलं. “फडणवीसांना राष्ट्रवादीत घ्यावं असं नाही वाटलं. कारण ते राष्ट्रवादीत आल्यावर माझंच महत्त्व कमी झालं असतं. त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचं कारण काय, आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलोय का?” असा मिश्किल प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? किती आमदारांचा पाठिंबा? अजित पवारांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

अजित पवारांच्या या उत्तरानंतर उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खळखळून हसले. तसंच, फडणवीसांनीही यावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ते त्यांचा पक्ष सोडणार नाही, मी माझा पक्ष सोडणार नाही. चुकीच्या ठिकाणी योग्य व्यक्ती आहे, असं बोलण्यापेक्षा सर्व योग्य व्यक्ती एकत्र आहोत, आम्ही तिघं आता एकत्रित आहोत, निश्चित मला पूर्ण अपेक्षा आहे की विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना गुणात्मक परिवर्तन महाराष्ट्रात घडलंय हे स्पष्ट होईल.

हेही वाचा >> “सरकारच्या ज्योतिषाने म्हणे…”, लोकसभा निवडणुकीवरून ठाकरे गटाचा आरोप; म्हणाले, “मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग…”

अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके दोन गट आहेत की एकाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत? यावर अजित पवार पुढे म्हणाले, “हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तिथे आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या काळात निवडणूक आयोग त्यासंदर्भात आपला निर्णय घेईल. आम्ही सगळ्यांनी बहुमताचा आदर करून जी भूमिका घेतली, ती भूमिका योग्य आहे, असं माझं मत आहे.” तुमच्याकडे सध्या किती आमदार आहेत? यावर अजित पवारांनी सांगितलं, “जेवढे आमदार बरोबर असणं गरजेचं आहे. तेवढे आमदार माझ्याबरोबर आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are we here to play ajit pawars question in the presence of fadnavis sgk