राज्यात भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बंडखोर गटासोबत एकत्र येत सरकार स्थापन केलं. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहित नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उत्तर दिलं. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी अतिशय सुंदर पत्र लिहिल्याचं सांगितलं. तसेच मी त्यांची भेट घेणार असल्याचंही नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा विचार केला, पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. म्हणून मग मी फोन करून त्यांचे आभार मानले. राज ठाकरे यांची अजूनही तब्येत बरी नाही. ते नुकतेच रुग्णालयातून बाहेर आलेत. घरीच आहेत. मी त्यांची भेटही घेणार आहे.”

“शरद पवारांनी माझा गौरवपूर्ण उल्लेख केला त्याचा आनंद”

“मला आनंद आहे की शरद पवार यांनी देखील संघ, संघाची भूमिका, संघाची शिस्त याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी माझा उल्लेख गौरवपूर्ण केला त्याचा मला आनंद आहे. त्यांनी मला संघस्वयंसेवक म्हटलं, मी आहेच. मी त्यांचे मनापासून आभार मानतो,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आधी नितीन गडकरी, आता देवेंद्र फडणवीस; भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण”; ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप

“हे खरं आहे की बंडखोर आमदार ईडीमुळेच इकडं आलेत, मात्र…”

“आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीत. मघाशी तिकडली काही मंडळी इकडल्या मंडळींना ईडी-ईडी असं म्हणत ओरडत होते. हे खरं आहे की ते ईडीमुळेच इकडं आलेत. मात्र, ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत,” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

“ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार आहे”

“महाविकास आघाडी सरकार आले तेव्हाच मी सांगतो होतो की हे सरकारन टिकणार नाही. त्यावेळी मी पुन्हा येईन ही कविता म्हटली होती. त्यावर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली होती. पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : Maharashtra Floor Test Live : फडणवीसांच्या जागी शिंदे मुख्यमंत्री होतात, यात काहीतरी काळंबेरं आहे – अजित पवार

राज ठाकरेंनी पत्रात फडणवीसांविषयी काय म्हटलं?

“सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…” असं म्हणत राज यांनी पत्राची सुरुवात केली आहे.

पुढे राज लिहितात, “तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं अशूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारु, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपम-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत.”

फडणवीसांचा आदर्श सर्वांनी समोर ठेवला पाहिजे असंही राज यांनी या पत्रात म्हटलंय. “पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन!,” असं राज पत्रात म्हणतात.

‘आता जरा आपल्यासाठी’ असं म्हणत पत्राच्या मध्यापासून राज यांनी एका रुपकामधून फडणवीसांचा हा निर्णय माघार नसल्याचं म्हटलंय. “ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे,” असं राज म्हणालेत.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२”

पत्राच्या शेवटी राज यांनी, “एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!” असं म्हणत फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on raj thackeray letter in assembly session pbs
First published on: 04-07-2022 at 13:35 IST