छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली मविआची जाहीर सभा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून या सभेवर आणि सभेतील भाषणांवर खोचक आणि आक्रमक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गैरहजेरीची चर्चा सुरू झाली आहे. नाना पटोले सभेत हजर नसल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यांच्या गैरहजेरीच्या नेमक्या कारणाबाबत महाविकासआघाडीतच एकमत नसल्याचं दिसून आलं आहे.
राऊत म्हणतात, “नाना तर दिवसभर झोपून होते!”
नाना पटोलेंच्या गैरहजेरीमुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. यावर स्पष्टीकरण देताना आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृतीचं कारण दिलं होतं. “नाना पटोले काल उपस्थित नव्हते हे खरं आहे. पण नाना पटोलेंची प्रकृती बरी नाहीये. तुम्ही त्यांना आत्ताही फोन केला, तरी त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्यांची प्रकृती बरी नाही. कालच्या सभेला ते येण्याच्या तयारीत होते. पण ते मुंबईतल्या निवासस्थानी काल दिवसभर झोपूनच होते”, असं ठामपणे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एकीकडे संजय राऊतांनी नाना पटोले दिवसभर झोपून असल्याचं छातीठोकपणे पत्रकार परिषदेत सांगितलं असताना आज नाना पटोलेंनी सुरतमध्ये प्रतिक्रिया देताना वेगळंच कारण सांगितलं. राहुल गांधींनी सुरत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना जामीन मंजूरही झाला आहे. या सुनावणीसाठी राहुल गांधी स्वत: सुरतला होते. त्यांच्या दौऱ्यासाठी नाना पटोले सुरतला आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोलेंनी संजय राऊतांचा दावा साफ खोडून काढला. “मला दिल्लीला बोलवलं होतं. काल दिल्लीत आजच्या आमच्या सुरतच्या दौऱ्याचं नियोजन करायचं होतं. त्यासाठी मी दिल्लीला होतो. माध्यमात सांगितलं गेलं की माझी प्रकृती बरी नव्हती म्हणून मी नाही आलो. पण माझी प्रकृती चांगली असते, माझ्यामुळे दुसऱ्या कुणाची प्रकृती खराब होत असेल, पण माझी नाही. काल दिल्लीला गेलो असल्यामुळे मी त्या सभेला नव्हतो”, असं नाना पटोले म्हणाले. “मी सभेत राहिलो तरी बातमी होते आणि नाही राहिलो तरी बातमी होते. त्यासाठी नाही, पण दिल्लीला बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेलो होतो”, असंही नाना पटोलेंनी नमूद केलं.
दरम्यान, या सगळ्या गोंधळावर भाजपाकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “नाना पटोलेंच्या पोटातलं दु:खं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे”, असं रावसाहेब दानवे माध्यमांना म्हणाले.