शहरातील सातपूर येथील राधाकृष्णनगरात राहणाऱ्या फळ विक्रेत्याने दोन युवा मुलांसह घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेतला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसर हादरला असून आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
देवळा तालुक्यातील उमराणे येथील मूळ रहिवासी असलेले दीपक शिरोडे (५५) हे दोन मुलगे, पत्नीसह सातपूरच्या राधाकृष्णनगरात राहत होते. बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळ त्यांचे घर आहे. अशोकनगर येथील शेवटच्या बस थांब्याजवळ फळ विक्री करीत असत. त्यांची दोनही मुले प्रसाद (२५) आणि राकेश (२३) ही शिवाजीनगर परिसरात चारचाकीवरुन फळ विक्री करीत. दुपारी दीपक शिरोडे यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या असताना दीपक हे दोनही मुलांसह घरातच होते. थोड्या वेळाने दीपक यांची पत्नी घरी आली असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. बराचवेळ आवाज देवूनही कोणी दरवाजा उघडत नसल्याने परिसरातील रहिवाशांच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता घरातील तीन खोल्यांमध्ये दीपक यांच्यासह दोन्ही मुलांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दरम्यान, प्रसाद यांची पत्नी गर्भवती असल्याने मुंबई येथे माहेरी गेल्या होत्या. रविवारी सकाळीच त्यांना कन्यारत्न झाले. ही आनंदी वार्ता समजली असताना काही वेळातच घरातील तिघा पुरुषांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.