-
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
-
या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली होती.
-
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावरही नाराजी व्यक्त केली.
-
शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं आहे. हा पूर्वनियोजत कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. मी मॉं आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
-
आज जी परिस्थिती भाजपाने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, ही परिस्थिती ते उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आत्ता जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक शेवटची असेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
-
पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर संताप व्यक्त करत निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, अशी मागणी केली. “आत्ताचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेच ही आमची मागणी आहे”, असं ते म्हणाले.
-
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अयोग्य आहे. याप्रकरणी आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घटनेनुसार या आमदारांना कोणत्यातरी पक्षात विलीन होणं बंधनकारक आहे. मात्र, ते कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत. निवडणूक आयोगाने घाईघाईने हा निकाल देण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
निवडणूक आयुक्तांची नेमणूक घाईघाईने करण्यात आली होती. यासंदर्भात प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली आहे. जर या देशात सर्व गोष्टी निवडणुकीद्वारे होत असतील, तर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक का होते? हा लोकशाहीचा गाभ्याला धक्का पोहोचवणारा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.
-
पक्षनिधीवर बोलताना ते म्हणाले, “पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. नाहीतर निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह आणि नाव ठरवण्याचा अधिकार आहे. देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे”
-
आमचं हिदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, हिंदुत्त्वाचा बुरखा घालून कोणी राष्ट्र बुडवायला निघालं असेल तर कडवट हिंदू म्हणून प्रत्येकाने यांच्या विरोधात लढायला उभं राहिलं पाहिजे, असेही आवाहनही त्यांनी केले.
-
उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. याचा निकाल काय लागेल हे घटनातज्ज्ञांनी सांगितलं आहे. मात्र, गुंतागूंत वाढावी, म्हणून आयोगाने हा निकाल दिला नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
-
शिंदे गटाच्या व्हीपबाबत बोलताना ते म्हणाले, “आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला मान्यता दिली आहे. दोन गट आहेत, हे मान्य केलं आहे. त्यानुसार आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं आहे.”
-
मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं, याचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकत नव्हतं. मात्र, आयोगाच्या या निर्णयाला आम्ही आव्हान दिलं आहे. त्या गटाला त्यांनी नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही, असेही ते म्हणाले.
-
दरम्यान, याप्रकरणानंतर शरद पवार, ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांचा फोन आला होता, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
-
हे प्रकरण आता देशभर पेटणार असून भाजपा अशा प्रकारे देशातील इतर पक्षही फोडतील, अशी भिती सध्या अनेकांना वाटू लागली आहे, असेही ते म्हणाले.
PHOTOS : निवडणूक आयोगाच्या बरखास्तीची मागणी, पक्षनिधी ते शिंदे गटाचा व्हीप; उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे
आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली होती.
Web Title: Uddhav thackeray pc criticized bjp election commission reaction on shinde group whip spb