Importance of Earth Day : विविध प्राणी, पक्षी, डोंगर, पर्वतरांगा, नद्या अशा सर्व गोष्टींनी सजलेल्या सुंदर धरतीमातेसाठी, आपल्या पृथ्वीसाठी आज म्हणजेच २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करण्यामागे हेतू काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? पृथ्वीवरील वाढत असलेले प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी असा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.

सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, आपली पृथ्वी ही प्रचंड धोक्यात असल्याचे आपण पाहू शकतो. याबद्दलच जनजागृती करण्यासाठी अनेक देश, संस्था या वसुंधरा दिनानिमित्त नागरिकांमध्ये वातावरणासंबंधी, निसर्गासंबंधी त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती देण्याचे काम करत असतात. आज आपली पृथ्वी ५४ वा वसुंधरा दिवस साजरा करत आहे.

हेही वाचा : आरोग्य जपायचे तर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी नकोच! मात्र असे का? त्याची करणे जाणून घ्या…

मात्र, यंदा पृथ्वीवरील प्रदूषणाने तापमानाचा उचांक गाठल्याचे दृश्य आपल्याला दिसते. असंख्य ठिकाणी अवकाळी पाऊस, पूर आणि वादळ यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशासारखी परिस्थिती अधिक जास्त हाताबाहेर जाण्याआधीच, त्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी जगभरात विविध संस्था विविध मोहिमा आयोजित करत आहेत. अनेक कार्यक्रम, चर्चासत्र, कॉन्सर्ट अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून आणि आधुनिक पर्यावरणीय चळवळींमधून पृथ्वीवर निरोगी आयुष्यासाठी बदल किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याचे काम करत आहेत.

वसुंधरा दिवसाचा इतिहास [History of the day]

अमेरिकेतील सिनेटर आणि पर्यावरणवादी गेलॉर्ड नेल्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर डेनिस हेस यांनी सर्वप्रथम वसुंधरा दिनाची सुरुवात केली. अमेरिकेत पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीबद्दलच्या चिंतेतून नेल्सन आणि हेस यांनी या दिवसाची सुरुवात केली. असे करण्यामागचे अजून एक मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत, १९६९ साली कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरामध्ये झालेली भीषण तेल गळती, हेदेखील होते.

२२ एप्रिल १९७० रोजी तब्ब्ल २० दशलक्ष अमेरिकन नागरिकांनी जलप्रदूषण, तेल गळती, जंगलातील आग, वायू प्रदूषण यांसारख्या विविध पर्यावरणीय संकटांच्या विरोधात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. हळूहळू विविध देशांमधील अनेक शहरे या चळवळीमध्ये सामील झाली आणि ही चळवळ जगातील सर्वात मोठ्या निषेधांपैकी एक बनली.

हेही वाचा : “मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स

वसुंधरा दिनाची यंदाची थीम [Theme of Earth Day]

वसुंधरा दिनाची यंदाची थीम ही ‘प्लॅनेट Vs. प्लास्टिक’ अशी आहे. या थीमचा उद्देश हा प्लास्टिक प्रदूषणामुळे मानव आणि पर्यावरण या दोन्हींवर होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे असा आहे. ही थीम यूएनच्या (UN) ऐतिहासिक ‘प्लास्टिक अधिवेशन’ लक्षात घेऊन निवडण्यात आली आहे. हे अधिवेशन वर्ष २०२४ च्या अखेरीस स्वीकारले जाण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते. वर्ष २०४० पर्यंत प्लास्टिक प्रदूषण संपवण्याची मागणी ही तब्ब्ल ५० हून अधिक देशांनी केली आहे.