Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या अनुषंगाने अजित पवार यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांवर भाष्य केलं आहे. तसंच बारामतीत काय होईल ते देखील सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, माझा अभिमन्यू वगैरे झाला आहे असं मला वाटत नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस होते. त्यांचं वर्चस्व महाराष्ट्र सरकारवर होतं. त्या काळात भाजपाने खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक लोक तिकडे घेतले. लोकांना वाटत होतं की २० वर्षे तरी भाजपात सत्तेत राहणार. मात्र निवडणूक जवळ आली की अशा गोष्टी घडतात. तिकिट मिळालं तर पक्ष चांगला नाही मिळालं तर काही बरोबर नाही अशा गोष्टी घडतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्या पक्षातून जे सोडून गेले त्यांच्या जाण्याची सल नाही

कुणाच्याही जाण्याची सल नाही. माझ्याबरोबर बहुतांश आमदार आल्याने आपल्याला त्यांनाच तिकिट द्यावं लागेल. फार काही बदल करता येणार नाहीत हे मला माहीत होतं. त्यामुळे कुणी पक्ष सोडून गेलं तरीही माझ्या मनात कसलीही सल वगैरे नाही. लोकसभेला जे काही झालं ते झालं. त्यानंतर आम्ही चांगल्या योजना आणल्या आहेत. मात्र आमचे विरोधक खोटं बोलत आहेत. एकीकडे सांगत आहात महायुतीच्या योजना राज्याच्या विकासाला खिळ घालणाऱ्या आणि आर्थिक संकटात पाडणाऱ्या आहेत असं विरोधक म्हणत आहेत. मात्र भाषणांत याच योजनांचे पैसे वाढवू म्हणतात. त्या गोष्टींना फार काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा ती बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसने आणि इतर विरोधकांनी केला. कोर्टात गेले, पण त्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही. असंही अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले. अजित पवार यांनी News 18 लोकमतला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अजित पवारांनी ( Ajit Pawar ) ही उत्तरं दिली आहे.

हे पण वाचा- Ajit Pawar : “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

बारामतीत निवडणुकीचा मूड काय?

माझ्या बारामतीत माझ्यासाठी मला मूड चांगला दिसतो आहे. बारामतीकर मतदान करतील. मतांची टक्केवारी किती होते त्यावरुन पुढचं चित्र सांगता येईल. मी सातवेळा आमदारकीची निवडणूक आजवर लढवली आहे. मी समोरच्या उमेदवाराला कमी लेखत नाही. मी समोरचाही आपल्या तुल्यबळाचाच उमेदवार आहे असं समजूनच मी निवडणूक लढवतो असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील का?

शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील का? हे विचारलं असता अजित पवार म्हणाले, “मी याबद्दल खूप मोठी किंमत चुकवली आहे. मला सगळ्या महाराष्ट्राने व्हिलन ठरवलं. असाच एक प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी झाला होता. त्यावेळी निवृत्ती जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांनी तो निर्णय फिरवला. शरद पवारांच्या मनात काय हे आजपर्यंत कुठल्याच व्यक्तील कळलेलं नाही. मी घरातला आहे तरीही मला ते कळलेलं नाही. मला त्यांची निवडणुकीचं धोरणच कधी समजलं नाही. कारण २०१४ मध्ये पूर्ण निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपासह मंत्रिमंडळात जायचाही प्रसंग आला होता. शिवसेना चालत नाही असं तेव्हा सांगितलं. त्यानंतर २०१९ ला भाजपासह सगळी चर्चा झाली. त्यानंतर वरिष्ठांचे विचार बदलले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं ठरवलं. त्यामुळे मी काय ते निवृत्त होतील का? या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही.” असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar answer on will sharad pawar retire from politics what did he say scj