मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाने विविध कामे हाती घेतली असून पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सब वेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच नाला रुंदीकरणाची व नाला वळवण्याचीही कामे हाती घेण्यात येणार असून या कामासाठी सुमारे २०९ कोटी खर्च येणार आहे. ही सर्व कामे पूर्ण होण्यास तीन ते चार वर्षे लागणार असून तोपर्यंत पाणी अंधेरी सब वेमध्ये पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच एकमेव पर्याय असणार आहे. आधीच मोगरा उदंचन केंद्रासाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना आणि ते काम रखडलेले असताना आता आणखी २०९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुसळधार पाऊस पडल्यानंतर अंधेरी सब वे, मिलन सब वेसह विविध ठिकाणच्या सखलभागात पाणी साचते. पावसाळ्यात मिलन सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून साठवण टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अंधेरी सब वे मात्र यंदाच्या पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पश्चिम परिसरातील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे पाऊस पडत असताना व भरतीची वेळी मोगरा नाल्याच्या पाण्याची पातळी वाढते व त्यालगत असलेल्या अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझाद नगर, वीरा देसाई रोड या परिसरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित, तसेच मालमत्तेची हानी होते. हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. अंधेरी पश्चिम भागातील पावसाचे पाणी अंधेरी सब वे मार्गे मोगरा नाल्यामधून वाहून पुढे मिल्लत नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. या परिस्थितीचा अभ्यास करून पालिकेने मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच जिथे नाल्याचे रुंदीकरण करणे शक्य नाही अशा ठिकाणी नाला वळवून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा…डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून सेवा-सुविधा

अंधेरी सब वे परिसर सखल भाग असून जवळच मोठा उतार असल्यामुळे ताशी ५० मिमी पाऊस पडतो तेव्हा प्रति सेकंद ५० हजार लिटर पाणी वेगाने वाहत येते. त्या तुलनेत नाल्याची रुंदी कमी असल्यामुळे पाणी साचते. त्यामुळे नाल्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे, असे पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नाल्यातील पाणी पुढे मोगरा उदंचन केंद्रापर्यंत नेऊन मग समुद्रात सोडले जाणार आहे. मात्र मोगरा उदंचन केंद्राचे काम रखडले आहे. परंतु, तोपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून त्यानंतर निविदा मागवण्यात येतील. त्यामुळे प्रत्यक्षात पावसाळ्यानंतरच ही कामे सुरू होऊ शकणार आहेत. रेल्वे रुळांखालून नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम क्लिष्ट असून ते पूर्ण होण्यास तीन ते चार वर्षे लागू शकतात. त्यामुळे पुढील किमान तीन पावसाळे तरी अंधेरी सब वे परिसराला दिलासा मिळू शकणार नाही.

हेही वाचा…डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम रखडल्यामुळे मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्यावर्षी सुरू होऊ शकले नाही. या पुलाची एक बाजू नुकतीच सुरू झाली असल्यामुळे अंधेरी सब वे परिसरातील वाहतुकीचा ताण आता थोडा कमी झाला आहे. त्यामुळे आता या कामासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. या कामाकरीता सल्लागार नेमण्यात आला आहे, निविदेचा मसुदाही तयार झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अंधेरी सब वे येथून अंधेरी स्थानक जवळ असल्यामुळे या रस्त्याचा वापर जास्त होतो. त्यामुळे या पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी अधिकचे मनुष्यबळ तैनात करणे, पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवणे आणि नाल्याची पाणीपातळी वाढली की वेळीच वाहतूक थांबवणे हे उपाय करावे लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.