मुंबई: परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला. पण आपला मित्रपक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत नसल्याची तक्रार करतानाच ठाणे, नाशिक, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, संभाजीनगर, पालघर हे मतदारसंघ मित्रपक्षांसाठी अजिबात सोडू नयेत, अशी आग्रही भूमिका शिवसेनेच्या मंत्री – आमदारांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने युतीधर्म पाळा, मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्या अशा सूचना शिंदे यांनी बैठकीत दिल्याचे समजते.

हक्काचे मतदारसंघ भाजपला द्यावे लागले, काही ठिकाणी भाजपच्या दबावामुळे ऐनवेळी उमेदवार बदलावे लागल्याच्या घटना ताज्या असतानाच ठाणे, नाशिकसह आणखी काही मतदारसंघावर मित्रपक्षांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे मंत्री, आमदार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप करण्यात आला. आपण धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळे मिळाली. रायगड, शिरूर आपल्या हक्काचे मतदारसंघ मित्रपक्षाला देऊन आपण अपमान गिळून प्रचार सुरू केला आहे पण मित्रपक्षांकडून योग्य वागणूक मिळत नसून आता नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नयेत. यासाठी ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी या वेळी नेते आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर युतीच्या सरकारमध्ये तडजोडी कराव्या लागतात. युतीधर्म पाळावा लागतो. तुम्ही मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जोमाने प्रचार करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी

उमेदवारी नाकारली तरी अन्यत्र संधी

आघाडी व युतीच्या सरकारमध्ये थोड्या कुरघोडी असतात, त्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा सत्तेचा वाटा द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युतीधर्म पाळावा. आपला उमेदवार असेल तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे असले पाहिजे, यावर चर्चा झाली. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी सर्वांना काम करावे. कोणी किती जागा लढवल्या त्याने फरक पडत नाही. भाजप हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याने एक-दोन जागा जास्त लढवल्या तर फरक पडत नाही. तसेच जागावाटपाचा तिढा एक-दोन दिवसांत सुटेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शिरसाट यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे ज्यांना उमेदवारी दिली नाही त्यांना अन्यत्र संधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षांतील नेत्यांशी कसे संबध असावेत, तिन्ही पक्षांनी मिळून काम करण्यावर सखोल चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी व्यवस्था तयार केली आहे. तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची असून निवडणुकीत विजय मिळवायचा आहे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी बैठकीनंतर सांगितले.