लोकसत्ता टीम
नागपूर: महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी तिन्ही सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होण्यास इच्छुक नेत्याच्या पक्ष प्रवेशासाठी निकष ठरले आहे. या निकषाबाबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्याशिवाय संबंधिताला महायुतीच्या पक्षात प्रवेश मिळणार नाही.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये गुरूवारी (२३ जानेवारी २०२५) झालेल्या ‘मिट द प्रेस’ या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, प्रथम लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकीत महायुतीत सहभागी पक्षातील उमेदवाराविरोधात लढलेल्या कोणत्याही नेत्याला पक्षात घेऊ नये असे महायुतीच्या नेत्यात निश्चित झाले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे तुर्तास या नेत्यांना महायुतीच्या पक्षात प्रवेश मिळणार नाही.
आणखी वाचा-निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला, गडकरींवर नामुष्कीची वेळ!, ‘एनएचआय’ने हात झटकले, आमदाराचे मौन
दरम्यान निवडणूक न लढलेल्या इतर मोठ्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाबाबत तिनही पक्षाचे नेते एकत्र बसून महायुतीला त्यामुळे होणारा लाभ व तोटा बघून निर्णय घेतील. परंतु महायुतीला नुकसान होईल व सत्ताधारी पक्षाला राजकीय हाणी होईल अशा नेत्याला कोणत्याही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. सध्या सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेवर असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा सर्वांगिन विकास होत आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षाकडे विरोधी पक्षातून येऊ इच्छिनाऱ्या नेत्यांची मोठी यादी आहे. परंतु नवीन निकषानुसारच या सर्व नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत तिन्ही पक्षाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान महायुती भक्कम होईल अशा नेत्यांना प्रवेशाची मुभा असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. तर तालुका व बुथ स्तरावरील नेत्यांचे प्रवेश मात्र स्थानिक स्तरावर घेतले जाणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे आता महायुतीतील तिन्ही पक्षाला विरोधी पक्षातील नेत्यांवर प्रवेशाबाबत मर्यादा आल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-बुलढाणा : वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई, महसूल विभागाने १५ बोटी केल्या उद्ध्वस्त
प्रत्येक मंत्र्याकडे भाजपचा एक कार्यकर्ता विशेष कार्य अधिकारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता प्रत्येक मंत्र्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त राहणार कायच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणूक काळामध्ये जनतेला अनेक आश्वासने दिले. त्याच्या पूर्ततेसाठी प्रत्येक मंत्र्याकडे भाजपचा एक कार्यकर्ता विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त होईल. प्रत्येक १५ दिवसांत मंत्री पक्ष कार्यालयात एक जनता दरबार घेईल. तर मंत्री प्रत्येक पंधरा दिवसांत एका जिल्ह्यात मुक्कामी राहिल. त्यातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न राहिल.
© The Indian Express (P) Ltd