नागपूर : महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाविरूध्द भारतीय जनता युवा मोर्चाने आघाडीच्या नेत्यांना सदबुद्धी दे यासाठी नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात महालातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत आघाडीच्या नेत्यांचा निषेध केला.
भारतीय जनता मोर्चाच्यावतीने नागपुरात आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यानी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हेच खरे शिवाजी महाराजावर अन्याय करणारे आहे, असे फलक हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यानी घोषणा देत निषेध केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मालवणमध्ये जी काही दुर्घटना झाली त्यामध्ये सरकारमधील सगळ्या नेत्यांनी माफी मागितली आहे. तरी राजकारण करण्यात महाविकास आघाडी इतक्या खाली गेली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे.
हेही वाचा…गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सगळ्यांसाठी वंदनीय आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शिवभक्तांची क्षमा मागितली, तरीही महाविकास आघाडीचे भ्रष्ट नेते राजकारण करून निवडणुकीच्या काळात अराजकता पसरविण्याचे प्रयत्न करत आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दरोडेखोर,लुटारू म्हटले आहे. त्याचे उत्तर नाना पटोले देणार का.. मध्यप्रदेश मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून पाडला गेला याचे उत्तर काँग्रेस देणार का.. संजय राऊत यांनी तर छत्रपती शिवरायांचे वंशज यांना वंशजाना पुरावा मागितला याचे उत्तर उद्धव ठाकरे देणार का.. अफजल खान शाहिस्तेखान नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नसती असे जितेंद्र आव्हाड म्हणतात याचे उत्तर शरद पवार देतील का….
हेही वाचा…विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग
शिवाजी महाराजांवर टीका करणारे महाविकास आघाडीचे नेते आहे त्यामुळे त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. आम्ही महाविकास आघाडीला खेटरं मारो आंदोलन येत्या काळात करू, असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेसने पंतप्रधानानी माफी मागावी अशी मागणी केली होती त्यामुळे ते महाराष्ट्रात आले त्यांनी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. पंतप्रधानांनी माफी मागितली यापेक्षा अधिक काँग्रेसला काय हवे आहे. त्यांना केवळ मतांचे राजकारण करायचे आहे. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाविकास आघाडी हे महाराष्ट्राला कलंकित करीत आहे. त्यांना त्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे काही घेणे देणे नाही असेही बावनकुळे म्हणाले
© The Indian Express (P) Ltd