भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायंस जिओ या देशातील तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी राजधानी दिल्लीतील काही परिसरात सेवा बंद केली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात अपेक्षित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना सेवा बंद करण्याची निर्देश दिले होते. सरकारच्या निर्देशानंतर एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ यांनी दिल्लीच्या अनेक भागांत व्हॉईस आणि इंटरनेटसह, एसएमएस सेवाही बंद केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, सकाळी १० वाजेपासून एअरटेलची सेवा बंद करण्यात आली असून सेवा केव्हापर्यंत पूर्ववत केली जाईल याबात कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकारच्या आदेशानुसार, व्हॉइस, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. सेवा पूर्ववत करण्याचे आदेश मिळताच सेवा पुन्हा बहाल केली जाईल अशी माहिती एअरटेलच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडियानेही दिल्लीतील बहुतांश भागात सेवा बंद ठेवली आहे. सकाळी ९ वाजेपासून व्होडाफोनची सेवा अधिकांश भागात बंद आहे. सरकारी आदेशानुसार सेवा बंद ठेवण्यात आली आहे, सरकारकडून पुढील आदेश मिळताच सेवा पूर्ववत केली जाईल असं स्पष्टीकरण व्होडाफोनने ट्विटरद्वारे दिलं आहे.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशातील विविध भागांमध्ये विरोध प्रदर्शने सुरू आहेत. विरोध प्रदर्शनांमुळे दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तर, एका रिपोर्टनुसार 2014 पासून आतापर्यंत 350 वेळेस भारतात इंटरनेट शटडाऊन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caa protests telecom companies airtel vodafone idea jio suspends mobile services in many parts of delhi sas