तीन हजार निरपराध नागरिकांचे बळी, लाखो लोक जखमी, पुढच्या काही पिढय़ांची बरबादी.. आणि एवढे होऊनही त्यास जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा नाही की त्यातील बळींच्या कुटुंबीयांना, जखमींना पुरेशी नुकसानभरपाई नाही..
भोपाळ वायुदुर्घटनेच्या २८व्या स्मृतिदिनी सोमवारी भोपाळवासीयांनी पुन्हा एकदा हे दुश्चित्र जगासमोर ठेवले. येथील विविध संस्था आणि संघटनांनी सोमवारी भोपाळमध्ये मोर्चे आणि सभा यांचे आयोजन करून वायुपीडितांची वेदनादायक कहाणी आणि सरकारची उदासीनता वेशीवर टांगली.
भोपाळ गॅसपीडित महिला उद्योग संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना संघटनेचे समन्वयक अब्दुल जब्बार यांनी, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. गॅसपीडितांना मदत करण्याऐवजी ही दोन्ही सरकारे बहुराष्ट्रीय कंपन्यांना संरक्षण देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या या नीतीमुळेच आजवर या वायुकांडास कारणीभूत असलेले, युनियन कार्बाईडचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन अँडरसन यांना अद्याप भारतात न्यायालयासमोर उभे करण्यासाठी आणता आलेले नाही, असे जब्बार म्हणाले. या सभेनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas tragedy rallies held compensation demanded for victims