सोहराबुद्दीन शेखच्या बनावट चकमकीप्रकरणी नऊ संशयित आरोपींना येथील तुरुंगातून कडेकोट बंदोबस्तात मुंबईला हलविण्यात आले. याप्रकरणी सुरू असलेला खटला गुजरातबाहेर चालवावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसरबी यांना आंध्र प्रदेशातून आणले आणि अहमदाबाद शहराबाहेर बनावट चकमक घडवून आणून २६ नोव्हें २००५ रोजी शेख याला मारण्यात आले तर कौसरबीचाही मृतदेह नंतर आढळला, असा आरोप आहे.
निलंबित पोलीस आयपीएस अधिकारी डी.जी.वंजारा, राजकुमार पंडियन व दिनेश एम.एन. यांच्यासह उर्वरित आरोपींना मुंबईतील सीबीआय न्यायालयात २३ नोव्हेंबरपूर्वी हजर करावयाचे आहे. वंजारा आणि पंडियन यांना वेगवेगळ्या वाहनांमधून मुंबईस पाठविण्यात आले. वंजारा यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व आरोपींना नंतर विशेष न्यायालयाच्या निर्देशांनुसार नंतर महाराष्ट्रातील तुरुंगामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. अन्य आरोपींमध्ये एच.एन.दाभी, बाळकृष्ण चौबे, अब्दुल रहमान, एम.एल.परमार, हिमांशू सिंग आणि श्याम सिंग यांचा समावेश आहे. या खटल्याशी संबंधित अभय चुडासामा आणि एन.के.अमीन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सूट मागितली असून त्यांना अन्य आरोपींसमवेत न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता कमी आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine prisoners are sent to mumbai of soharbuddin case