लोकसभा निवडणुकीच्या तीन फेऱ्या पार पडल्या आहेत. तसंच चौथी फेरी सोमवारी पडणार आहे. या फेऱ्यांमध्ये योग्य प्रकारे मतदान पार पडलं आहे. भाजपाची चिंता वाढली आहे, भाजपाला निवडणूक जड जाते आहे वगैरे मतप्रवाह तयार केला जातो आहे पण त्याला काहीही अर्थ नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे हे भ्रमाच्या दुनियेत जगत असल्याचाही टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारच लीड घेतील

लोकांनी हे ठरवलं आहे की मोदींना निवडून द्यायचं आहे. कारण मोदींनी जी विकासकामं केली आहेत आणि मोदी जे सांगत आहेत की पिक्चर अजून बाकी आहे त्यावर लोकांचा विश्वास बसला आहे. एवढंच काय मी हेदेखील व्यवस्थित सांगू शकतो की बारामती या मतदारसंघातूनही सुनेत्रा पवार लीड घेतली. ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे ते मी अनुभवलं आहे. निवडणूक आम्हाला अपेक्षा होती तशीच पार पडते आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; “उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच…”

उद्धव ठाकरे भ्रमात जगणारे आहेत

“उद्धव ठाकरे हे एक प्रकारच्या भ्रमात जगणारे व्यक्ती आहेत. मेटव्हर्स असतं त्याप्रमाणे त्यांनी एक भ्रमजग त्यांनी तयार केलं आहे. त्या जगाचे राजेही उद्धव ठाकरे आहेत, मूल्यंही त्यांचीच आहेत आणि निर्णयही त्यांचेच आहेत. अशा या जगात जगणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच उद्धव ठाकरेंना अचानक हा भ्रम झाला की देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना तयार करुन मुख्यमंत्री करणार होते आणि असा शब्द मी दिला होता. सहा वर्षे काय म्हणत होते की अमित शाह यांनी वचन दिलं होतं. आता ते बदललं, आता देवेंद्र फडणवीसने शब्द दिला होता म्हणत आहेत. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. खोटं बोलताना एक लपवण्यासाठी दुसरं, दुसरं लपवण्यासाठी आणखी एक बोलावं लागतं आणि ते सगळं प्रकाशात येतंच. सहा वर्षांनी जर आदित्य ठाकरेंबाबत उद्धव ठाकरे असं म्हणत असतील तर माझं एकच उत्तर आहे की माझं डोकं ठिकाणावर आहे. त्यामुळे मला हे समजतं की कोण जाऊ शकतं. मी त्यांना हे जरुर म्हटलं होतं की आदित्यला (आदित्य ठाकरे) निवडणूक तुम्ही लढवा. त्यांनी माझ्याशी याची चर्चा केली होती.”

हे पण वाचा- “एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

मी पाच वर्षे ठाकरेंशी डील केलं होतं

“मी पाच वर्षे त्यांच्याशी डील केलं होतं. त्यांना सरकारमधलं काहीच माहीत नसणं याचा परिणाम सरकार चालवण्यावर होतो. इतक्या विचित्र आयडिया डोक्यातून निघतात, हे करा, ते करा, असंच झालं पाहिजे वगैरे. सरकार म्हणजे काय? प्रशासन म्हणजे काय हे जर माहीत असेल तर व्यक्ती लोकाभिमुख निर्णय घेतो. मग प्रसिद्धीचे निर्णय असतात ते घ्यायची गरज पडत नाही.” असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं आहे.

शिवसेनेत गडबड कशी झाली?

शिवसेनेत गडबड कुठे झाली? तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तिथे पहिली गडबड झाली. कारण त्यांचं म्हणणं काय होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार. जवळपास सगळी तयारी झाली होती की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करणार. त्यांच्या घरी गार्डही पोहचले होते. ठाण्यात फटाके फोडले गेले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. जर एकनाथ शिंदेंना वाटलं असेल की मला हे मुख्यमंत्री करतील तर तो त्यांचा भाबडेपणा आहे. युती सरकार आलं तेव्हापासून मुख्यमंत्री व्हायचं त्यांच्या मनात होतं. २००४ मध्ये त्यांनी तसा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे राणे बाहेर पडले. नारायण राणे बाहेर पडल्याने त्यांनी इच्छा थोडी मागे घेतली. बाळासाहेब ठाकरेंच्या रोलमध्ये ते गेले. त्यांनी जी बेइमानी केली ती मुख्यमंत्रिपदासाठीच केली. एकनाथ शिंदेंना मी जवळून ओळखतो, ते कट्टर शिवसैनिक आहे. त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरीही ते असं करणार नाहीत हे सांगणारा मीच होतो. पण एखाद्या अस्तित्त्वाची लढाई सुरु झाली की तो तुमच्या अधिपत्याखाली दबून राहिल हे जरुरी नाही. त्यातून ते सगळं घडलं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray is living in a world of illusion said devendra fadnavis scj