विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धाच्या विजयाची मालिका भारताने रविवारीही कायम राखली. रोहित शर्मा, विराट कोहली यांची दमदार फलंदाजी तर कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी हरवले. पावसाने सामन्यामध्ये दोनदा व्यत्यय आणला मात्र तरीही सर्वच क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा वरचढ कामगिरी करणाऱ्या भारताची पकड सामन्यावरुन कधीच सुटली नाही. विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सातवा विजय आहे. या विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असतानाच दुसरीकडे पाकिस्तानचे चाहते मात्र आपल्या संघावर भयंकर नाराज झाले आहेत. अगदी मँचेस्टरपासून ते कराचीपर्यंत अनेक चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना खडे बोल सुनावले असून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मँचेस्टरच्या मैदानातील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वचषक स्पर्धेतील काही सामने पावसामुळे अनिर्णित राहिल्याने भारत पाकिस्तान सामन्यातही पावसाचा प्रभाव दिसून येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पाकिस्तानने याच शक्यतेमुळे नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ३३६ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना शेवटच्या काही षटकांच्या आधी पावसामुळे काही काळ सामना थांबवावा लागला होता. ३३७ धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाला सुरुवात चांगली झाली. मात्र विजय शंकरने आपल्या पहिल्याच चेंडूवर इमाम-उल-हकला पायचित केले. त्यानंतर बबार आझम आणि फकर झमानची जोडी जमली. मात्र ती जोडी फुटल्यानंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पाकिस्तानी संघाचा डाव गडगडला. पाकिस्तानचे सहा गडी तंबूत परतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. यावेळी डकवर्थ-लुइस नियमानुसार भारत ८५ धावांनी आघाडीवर होता. त्यामुळेच सामना पु्न्हा सुरु झाला तेव्हा पाकिस्तानसमोर ३० चेंडूंमध्ये १३६ धवांचे आव्हान ठेवण्यात आले आणि भारताचा ८९ धावांनी विजय झाला.

पाकिस्तानच्या या पराभावनंतर पाकिस्तानी संघाचे खेळाडू ड्रेसिंग रुमकडे परत जात असताना मैदानात सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या आणि पराभवाने निराश झालेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी खेळाडूंची हूर्यो उडवली. तसेच तुम्हाला लाज वाटत नाही का असा सवालही उपस्थित केला. ‘साऊथ काश्मीर’ नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पाकिस्तानी चाहत्यांचा संताप दाखवणारा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. एका चहात्याने हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे. सामना संपल्यानंतर पाकिस्तानी ड्रेसिंग रुममध्ये परतत असणाऱ्या इमाद वसीम आणि शादाब खान या दोन्ही फलंदाजांना पाकिस्तानी प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला. हे दोघेही ड्रेसिंग रुमध्ये जात असताना प्रेक्षकांनी त्यांच्याकडे पाहून शेरेबाजी केली. ‘फिटे मुह तोहडे (तुमचे थोबाड फुटो)’, ‘लाज वाटतेय का काही?’, ‘काही लाज आहे की नाही?’, ‘(शोएब) मलिकला संघातून काढा’, ‘तुम्हाला कशाचीच लाज वाटत नाही’, ‘मलिक गद्दार आहे’ अशापद्धतीची घोषणाबाजी या चाहत्यांनी पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना केल्याचे या व्हिडिओत दिसते. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन संघावर कठोर शब्दांमध्ये टिका केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघ गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशा सर्वच श्रेत्रांमध्ये ढिसाळ कामगिरी करताना दिसल्याची टिका या चाहत्यांनी सोशल नेटवर्किगवरुन केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani fans abusing pakistan cricket team after their defeat against india scsg