आयुर्उपचार : वैद्य प्रभाकर शेंड्ये

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुर्वेद लोकप्रिय असण्याचे एक मोठे कारण म्हणजे आयुर्वेद औषधांचा दुष्परिणाम (साइड इफेक्ट) होत नाही, असे मानले जाते. पण हे खरे आहे का?

साइड इफेक्ट म्हणजे औषधे अथवा उपचार घेताना अपेक्षित परिणामांबरोबर निर्माण होणारे दुष्परिणाम. ‘मी आयुर्वेद औषधे घेतो, अनेक वर्षे मला काही होत नाही.’ ‘गुडघेदुखीसाठी मी गुग्गुळ घेतो, पोट साफ होण्यासाठी मी रोज त्रिफळा घेतो.’ ही आणि अशी वाक्ये आपल्या कानावर नेहमी पडत असतात. आवळा, हळद, ज्येष्ठमध, च्यवनप्राश आदी अनेक लोक घेत असतात.

झाला तर उपयोग. नाही तर नाही पण त्रास तर होणार नाही ना! असा दृष्टिकोन ठेवून लोक अनेक वेळेला आयुर्वेदिक औषधांकडे बघतात. मात्र हे योग्य नाही. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आयुर्वेदिक औषधाला साइड इफेक्ट निश्चित आहेत.

उदाहरणे

’ पोट साफ होत नाही म्हणून अनेक वर्षे चूर्ण घेण्याने आतड्यांना कोरडेपणा येतो व बद्धकोष्ठता वाढत जाते.

’ त्रिभुवनकीर्ती यासारखी काही औषधे उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींना सहन होत नाहीत.

’ आरोग्यवर्धिनी यासारखी औषधे ठरावीक काळापुरती घ्यायला सांगितली आहेत. ती सतत घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

’ मधुमेहासाठी कडुनिंब रस, जांभुळ बी किंवा मेथी पावडर जास्त घेतली तर उलट्या, जुलाब इत्यादी त्रास होऊ शकतो.

आयुर्वेदिक चिकित्सेचा पाया हा एक रोग बरा करताना दुसरा रोग निर्माण होणार नाही हा आहे. हा नियम प्रत्येक रोगाची चिकित्सा करत असताना वैद्य पाळत असतो. यासाठीच औषधे देण्यापूर्वी रुग्णाची त्याच्या रोगाची सर्व माहिती विचारली जाते. रोग्याचे दोष, देह, बळ, काळ, अग्नी, प्रकृती, वय, सत्त्व, सात्म्य, आहार अशा अनेक बाबींचा विचार करून त्याला त्रास होणार नाही असे औषध सुचवले जाते. अशा वेळी दुष्परिणाम नक्कीच दिसत नाही.

परंतु इंटरनेटवर बघून, अर्धवट ज्ञानामुळे, चुकीच्या मात्रेत, चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या वेळेला औषध घेतले तर नक्की दुष्परिणाम दिसतात आणि आयुर्वेदाबद्दल प्रतिकूल मत होते.

drshendye@gmail.com

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Side effects of ayurvedic medicines akp