MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांमधून ‘पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलेन’ असं सांगितलं आहे. त्यात यंदाच्या पाडवा मेळाव्याआधीच मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे दावे केले जात असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिवाय काल पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आज महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतील. यावरूनही आज राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra News Updates 09 April 2024 : निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक रॅलीतील भाषणामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत असलेले भाजपचे उमेदवार तथा वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तरादाखल यापुढेही आपण याच पद्धतीने काँगेसविरोधात बोलत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमरावती : मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ती आहे. माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी स्वत: माझ्या मर्जीने घेतला आहे. आमदार रवी राणा यांची स्वत:चा युवा स्वाभिमान पक्ष आहे. ते भाजपमध्ये येतील की नाही, हे आम्ही ठरवू. खरे तर नवरा-बायकोच्या मध्ये कुणी न बोललेले बरे, असा टोला भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्रत्यक्षरित्या लगावला आहे.
पुणे : वाहनाला आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या पुणेकरांची संख्या आता वाढली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांतून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. गेल्या वर्षभरात एक क्रमांक सर्वाधिक महागडा ठरला असून, त्यासाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
यवतमाळ : महाराष्ट्राच्या राजकारणात देशमुख विरूद्ध पाटील हा राजकीय वाद नवा नाही. महाराष्ट्राचे एकुणच राजकारण अलिकडेपर्यंत देशमुख, मराठा, कुणबी (डीएमके) या समाजाभोवती फिरत आले आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा देशमुख विरूद्ध पाटील, हा राजकीय सामना रंगणार आहे.
मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली.
दुपारच्या सुमारास चऱ्होली गावाकडून आरोपी प्रशांत चारचाकी वाहन भरधाव वेगात घेऊन आला. या वाहनाला काळ्या काचा होत्या.
पुणे : सणासुदीच्या काळात वाहने खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदा पाडव्यानिमित्त गेल्या आठ दिवसांत पुण्यात ७ हजार ३३६ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत तब्बल ८५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मराठी पाटी नसलेल्या व्यावसायिकांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल.
ठाणे : महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नसून काँग्रेसची फरफट सुरू आहे, त्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केले. राजू वाघमारे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रपूर : शिवसेनेतील महाबंडानंतर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी महायुती सरकारला समर्थन जाहीर केले. तेव्हापासून राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
सांगली : पाखरांच्या मंजूळ स्वराबरोबरच वाद्यवृंदाच्या साथीने सादर झालेल्या मराठी गीतांच्या सुरेल स्वरामध्ये मंगळवारी पाडव्याची पहाट सुरेल स्वरांत नहाली. गेली २८ वर्षे प्रत्येक वर्षप्रतीपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला पहाटे पाच वाजता संपन्न होणारा सूर पहाटेचे हा आगळावेगळा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी नवी प्रथा सुरू करणारा कार्यक्रम मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला.
मुंबई : वरळी परिसरातील गांधी नगर येथे मंगळवारी सकाळी पावणे अकाराच्या सुमारास नगरपालिका औद्योगिक वसाहतीला अचानक आग लागली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.
नाशिक : दिवसागणिक उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य नदी, नाले व विहीरी आटल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तर स्थिती अधिक बिकट झाली आहे. आदिवासी भागातील महिलांना रात्री तसेच उन्हातान्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
नागपूर : ज्या लोकांनी अजूनही अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतलेले नाही त्यांनी १९ एप्रिलला मतदान झाल्यावर दर्शनाला यावे. मला आधीच सूचना द्यावी. अयोध्येत तुमची सर्व व्यवस्था असेल, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागपूरकर मतदारांना साद घातली.
नागपूर : गेल्या दोन लोकसभा निवडणुकींचा निकाल बघता भाजपने दक्षिण नागपुरातून आपल्या मतांची टक्केवारी वाढवली असली तरी त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. त्या दोन्ही निवडणुकतील मतांच्या टक्केवारीनुसार ओबीसी आणि दलितबहुल दक्षिण नागपुरात काँग्रेस आणि भाजपला मतांची टक्केवारी वाढवण्याची समान संधी आहे.
पुणे : वडगाव शेरी भागात मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा मुलीने बनाव रचला. मुंबईतील नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. मुनगंटीवार यांनी भाषणात काँग्रेसविरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
ज्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेनाची या पक्षाची स्थापना केली. तेव्हा मोदी हिमालयात असतील. अशा व्यक्तीने महाराष्ट्रातल्या शिवसेनेबाबत बोलणे म्हणजे कहर आहे. भाजपा हा पक्ष खंडणीखोर पक्ष आहे. अशा खंडणीखोर पक्षाच्या नेते काल चंद्रपुरात येऊन बोलून गेले. खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवेसनेला हिणवणं बरोबर नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेस लढवणार असलेल्या जागा – एकूण १७ जागा
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंडिदा ,,गडचिरोली, चंद्रूपर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असलेल्या जागा ( शरदचंद्र पवार गट )- एकूण १० जागा
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) लढवणार असलेल्या जागा – एकूण २१ जागा
जळगाव, परभणी, नाशिक, कल्याण,ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभीजानगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई , ईशान्य मुंबई
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस १७ जागावर, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट) १० जागांवर तर शिवेसना ( उद्धव ठाकरे गट) २१ जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच सांगलीच्या जागेचा तिढा सुटला असून ही जागा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Shiv Sena Uddhav faction will contest elections on 21 seats in Maharashtra, NCP SCP will contest elections on 10 seats and Congress on 17 seats.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/toM2Ijnz4A
— ANI (@ANI) April 9, 2024
मुंबईः शेअर बाजारातील व्यावसायासाठी बँकेत चालू (करंट) खाते उघडून न दिल्यामुळे संतापलेल्या चौघांनी २३ वर्षांच्या तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. याप्रकरणी तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा मुख्य सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
नाशिक : हमाली, तोलाई आणि वाराई कपाती संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगार वजन मापाच्या कामापासून दूर झाल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सलग पाचव्या दिवशी ठप्प राहिले. आचारसंहितेत प्रचलित पध्दतीनुसार ही प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
अकोला : पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त होण्यास विलंब झाल्याने वेतन थांबले. साडेपाच हजारावर कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. अमरावतीसह राज्यातील दोन विभागात ही अडचण आल्याची माहिती आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी संख्येत गेल्या तीन वर्षांत तिपटीहून जास्त वाढ झाली आहे. सोबतच अपघातांच्या संख्येमध्येही दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. माहिती अधिकारांतर्गत हा तपशील समोर आला आहे.
अमरावती : आपल्या आई -वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना पुन्हा आपले आई-वडील, घर मिळावे यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात १०६४ बालकांची सुटका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अशातच आज (९ एप्रिल) मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रपूरमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे. तेच बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे, अशी टीका केली होती. या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली म्हणणे हा नकली विचार, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असनाताही मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षां’वर होत असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी सोमवारी दिली.