Nitesh Rane Warns Bangladeshi and Rohingya : बांगलादेशी आणि घुसखोर रोहिंग्यांकडून भाऊच्या धक्क्यावरील मच्छिमार बांधवांवर अरेरावी करण्यात आली, तेथील एका महिलेवर हात उगारण्यात आला. याविरोधात आवाज उठवण्याकरता राज्याचे मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी आज भाऊच्या धक्क्याला भेट दिली. येथील कोळी बांधवांबरोबर त्यांनी चर्चा केली असून घुसखोरांना थेट इशारा दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, “काही दिवस अगोदर कोळी समाजाच्या लोकांनी हिंदुत्त्ववादी संघटनांना पत्र लिहिलं होतं. इथं एक घटना घडली आहे, इथे काही बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे येऊन अवैध पद्धतीने आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करायला देत नाही, एका कोळी भगिनीवर हात उचलण्याची हिंमत केली. त्यानुसार त्यांनी आम्हाला तक्रार केली. त्यामुळे हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आज समर्थनार्थ जमलो होतो. आमची स्पष्ट भूमिका आहे की बांगलादेशी आणि रोहिंग्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने कडक नियम लावले आहे. कोणताही बांगलादेशी आणि रोहिंगो भारतात राहता कामा नये. अशा पद्धतीने हिरव्या सापांची वळवळ आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्यावर सहन करणार नाही. हाच इशारा वजा धमकी द्यायला इथे आलो होतो.”
हे कराचीमधील बंदर नाही
“कोळी समाजातील बंधू भगिनींना वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांविरोधात काय होईल हे सांगण्याकरता आम्ही येथे आलो होतो. हे कराचीमधील बंदर नाही. हे हिंदू राष्ट्रातील बंदर आहे. त्यामुळे आमच्या बंदरावर कोणी त्रास देत असेल तर त्यांना कराची बंदरावर कसं पाठवयाचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता थेट ब्रेकिंग न्यूज देणार
“स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं की हिंदूंना मुसलमांनाकडून त्रास नाहीय, तर हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे. त्यामुळे आमच्यातीलच काही हिरव्या सापांना दूध पाजत आहेत. काश्मीरमध्ये काय झालं. त्यांनी धर्म विचारून, सिंदूर पाहून गोळ्या घातल्या. मी परत येथे पाहणी करायला येणार नाही, तुम्हाला थेट ब्रेकिंग न्यूज देणार”, असंही ते म्हणाले.