मालाड पश्चिमेतील अक्सा चौपाटीवर बंदी असतानाही जीवरक्षकांचा डोळा चुकवून पोहण्यासाठी गेलेल्या आठपैकी तीन तरुणांचा रविवारी सकाळी बुडून अंत झाला. या तरुणांपैकी दोन तरुणांना बाहेर काढण्यात जीवरक्षकांना यश आले. मात्र त्यापैकी एकाचाच जीव वाचविण्यात यश आले. पोहण्यासाठी हा समुद्रकिनारा अत्यंत धोकादायक असल्याचे फलक लावण्यात आलेले असले तरी नागरिकांकडून त्याची तमा बाळगली जात नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
मालाड पश्चिमेतील राजनपाडा या परिसरातील युनिक संकुल, साबळे चाळीत राहणारे आठ तरुण रविवारी सकाळी पोहण्यासाठी अक्सा चौपाटीवर आले. थोडा वेळ खेळल्यानंतर ते पाण्यात उतरले. त्याच वेळी ओहोटी सुरू झाली. त्यापैकी चारजण बुडत असल्याची आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाच्या एका जीवरक्षकासह रजनीकांत माशेलकर हे माजी जीवरक्षक तसेच काही गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यापैकी दोघेच जीवरक्षकांच्या हाती लागले. उर्वरित दोघांचा शोध लागला नाही.
संदेश मुणगेकर (२५) आणि दर्शन दळवी (२३) या दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दळवी याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र मुणगेकर बचावला. उर्वरित दोघे राकेश नलावडे (२२) आणि मयूरेश नाईक (२३) यांचा शोध अग्निशमन दलाने सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारात या दोघांचे मृतदेह आढळून आले.
टेहळणी टॉवरचे काय?
जुलै २००० मध्ये अक्सा चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेले कुरारमधील १३ तरुण बुडाले होते. त्यापैकी एकाला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले होते. मात्र हा तरुण मानसिक आजाराने ग्रस्त झाला होता. त्याचाही नंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन अनेक सूचना केल्या. जीवरक्षकांच्या संख्येत वाढ केली जाईल. स्वतंत्र टेहळणी टॉवर उभारला जाईल, असेही म्हटले होते. आता या ठिकाणी जीवरक्षक आहेत. परंतु टेहळणी टॉवर अद्याप नसल्याकडे गावकऱ्यांनी लक्ष वेधले. २००७ ते २०११ या काळात ५१ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या चौपाटय़ांवरील अत्याधुनिक सामुग्रीच्या खरेदीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद केली आहे. परंतु प्रत्यक्षात काहीही झालेले नाही, असा दावा स्थानिक गावकऱ्यांनी केला.
सर्वात धोकादायक!
मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी सर्वात धोकादायक अक्सा चौपाटी असल्याचे पालिकेत सुमारे ३५ वर्षे जीवरक्षक असलेले रजनीकांत माशेलकर यांनी सांगितले. अक्सा चौपाटी ही आतल्या बाजूला असून किनाऱ्यावरच मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे पोहण्यासाठी गेलेल्यांचा एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय खड्डय़ात कधी जाईल हे सांगणे कठीण असते. त्यामुळेच या समुद्रकिनारी दुर्घटना होतात, असा दावाही त्यांनी केला. या चौपाटीवर पोहण्यालाच कठोर बंदी घातली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. अग्निशमन दलाने आता जीवरक्षक उपलब्ध करून दिले आहेत. परंतु दोन-तीन जीवरक्षक पाण्यात उतरण्यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. या वर्षांत जीवरक्षकांना आतापर्यंत १४ जणांना वाचविण्यात यश आले असले तरी हे तरुण मात्र दुर्दैवी ठरले. जुहू येथील सिल्व्हर चौपाटी हेदेखील धोकादायक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 men drown off aksa beach