मुंबई: महावितरणकडून शेतकऱ्यांना खूप मोठय़ा सवलतीच्या दरात वीजपुरवठा होत असताना राज्यात १५ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांचे वीजबिल गेल्या पाच वर्षांत किंवा त्याहून अधिक काळ एकदाही भरलेले नाही. या कृषीग्राहकांकडे २१ हजार ६७ कोटी रुपये थकबाकी आहे. हे ग्राहक मोबाईल, डिटीएच आणि केबलचे बिल भरीत असताना अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात, हे आश्चर्यकारक असल्याचे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी येथे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कृषीपंपधारकांपैकी तीन लाख २३ हजार ग्राहकांनी गेली पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकदाही वीजबिल भरलेले नसून त्यांच्याकडे पाच हजार २१६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंडित वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय असून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन सिंघल यांनी केले.  वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणीपुरवठा, रुग्णालयांचे काम, इमारतीतील लिफ्ट, वाहतूक नियंत्रण, कार्यालयांचे कामकाज, बँकिंग अशा अनेक सेवा या वीजपुरवठय़ावर अवलंबून आहेत. महावितरणसुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून आपल्या ग्राहकांना पुरवते. महावितरणने २०२१ -२२ या आर्थिक वर्षांत वीजखरेदीपोटी ६९ हजार ४७८ कोटी रुपये खर्च केले होते. महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. त्यातून कंपनी वीजखरेदी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागविते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers do not pay the electricity bill agricultural pump mahavitraan inquiry revealed ysh