अडचणी, उपाय आणि सरकारी प्रयत्नांचा लोकसत्ताच्या व्यासपीठावरून ऊहापोह
‘लोकसत्ता’च्या वतीने विविध विषयांवर विचारमंथन घडवून आणणाऱ्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत या वेळी ‘पायाभूत सोयीसुविधा’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणाऱ्या या चर्चासत्रात या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी आपले विचार मांडतील.
‘टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड’ प्रस्तुत आणि ‘रिजन्सी ग्रुप’ आणि ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ यांच्या सहकार्याने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शिक्षण, अर्धनागरीकरण, शेती, सामाजिक न्याय, उद्योग, पर्यावरण या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. पायाभूत सोयीसुविधा ही शहरे तसेच ग्रामीण भागांमध्ये भेडसावणारी मोठी समस्या.
पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी सरकार तसेच महापालिकांच्या पातळीवर बरीच चर्चा होते. पण प्रश्न काही सुटत नाहीत. पायाभूत सोयीसुविधा पुरविताना विविध अडथळे पार करावे लागतात.
या पाश्र्वभूमीवर पायाभूत सुविधा पुरविताना येणाऱ्या अडचणी, त्यांवरील उपाय, सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न यावर आगामी ‘बदलता महाराष्ट्र’मध्ये चर्चा होईल. त्यातून सजग जनमताचा रेटा तयार करणे व विधायक बदल घडविणे, हे या परिसंवादाचे प्रमुख लक्ष्य आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव हा फार मोठा अडथळा असल्याचे दिसून आले आहे. अनेक शहरांचा विकास त्यामुळे खुंटलेला आहे. राज्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी सर्वात आधी पायाभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे. ‘बदलता महाराष्ट्र’ व्यासपीठावर ‘लोकसत्ता’ याविषयी सविस्तर विचारमंथन घडवून आणतेय, ही स्वागतार्ह बाब आहे. शासनाने या परिसंवादातील मतांची, सूचनांची दखल घेऊन विकास योजनांची आखणी करावी.
– सतीश उतेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीजेएसबी, बँक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta badalta maharashtra