राज्य परिवहन महामंडळाचा कोसळता डोलारा सावरण्यासाठी राज्य सरकारने आता भाडेवाढीचा मार्ग अवलंबला आहे. ही वाढ फक्त २.६० टक्केच असून साध्या-जलद सेवेमध्ये प्रतिकिमी २.५ पैसे आणि रात्र व निमआराम सेवेत प्रतिकिमी ३.३३ पैसे वाढ करण्यात आली आहे.  शिवनेरीच्या तिकिटात वाढ करण्यात आलेली नाही. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा १५०० कोटी रुपये आहे. या तोटय़ाबरोबरच जवळपास दर दोन महिन्यांनी डिझेलच्या दरवाढीमुळे महामंडळाला फटका बसत असतो. डिझेलच्या दरात १ रुपयाची वाढ झाली, तरी एसटीला दर दिवशी १४ लाख रुपयांचा भरुदड पडतो. या सर्वाचा विचार करून राज्य सरकारच्या ‘आपोआप भाडेवाढ सूत्रा’नुसार एसटीने भाडेवाढीचा मार्ग पत्करला आहे.  ग्रामीण भाग पूर्णपणे एसटीवर अवलंबून असल्याची जाणीव ठेवत ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र साध्या आणि जलद गाडय़ांसाठी पहिल्या १२ किलोमीटरसाठी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus becomes expensive