यवतमाळ – विवाह समारंभाकरीता वऱ्हाडी घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनास अपघात होऊन १४ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना आर्णी –बोरगाव मार्गावर आज बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तात्काळ आर्णी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आर्णी येथून लग्न समारंभाकरीता तालुक्यातील भंडारी शीवर येथे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. यात १४ जण जखमी झाले असून पाच ते सहा वऱ्हाडी गंभीर जखमी झाले.  जखमींमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. अपघात होताच मार्गावरील वाहनधारकांनी पोलिसांना माहिती देवून वैद्यकीय मदत मागवली. जखमींमध्ये सुरेश बाबर, नारायण बाबर, सुरेश तांबे, सौरभ शिंदे, मैना बालट, राधा शिंदे, बेबी राठोड, उकंडा राठोड, रोहित शेगर, सुमन शेगर, धर्माबाई तांबे, राजू शेर, प्रदीप शिंदे, दीपक सोळंके, सुनील तांबे, आरूषी सोळंके यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ आर्णी येथील रूग्णालयात हलविण्यात आले.