दिवाळीसाठी मिठाईने महागाईची शिडी चढण्यास सुरू केल्याने ग्राहकांनी तुलनेत स्वस्त असलेल्या चॉकलेटकडे मोर्चा वळवला आहे. सध्या मिठाई ४०० ते ८०० रुपये किलो आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ५०  ते १०० रुपये किलो मागे मिठाईची भाववाढ झाली आहे. सफेद पेढा ४०० रुपये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५०० रुपये किलो, बर्फीचेही दर वाढले असून पिस्ता, मलाई बर्फी ५०० रुपये किलोपर्यंत आहे. काजुकतली ६०० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करायची, कशी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चोकोबार रोल ५०० रुपये, तर सुक्या मेवा असलेली मिठाई ८०० रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. मोतीचूर, चुरमा लाडू ३०० रुपये किलो असून बदामी सोनपापडी ३०० रुपये किलो दराने विकली जात आहे. खोबऱ्याचे लाडू ३८० रुपये किलो आहेत.

महिला बचत गटांचीही चॉकलेट निर्मिती

मिठाईपेक्षा चॉकलेटच्या पदार्थाना टिकाऊपणामुळे मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळत आहे. गिफ्ट संस्कृतीपूर्वी घरी तयार केलेले दिवाळीच्या फराळाचे पदार्थ शेजारी व नातेवाईकांना देण्याची परंपरा होती. ती काहीशी थंडावली असून याउलट कॉर्पोरट संस्कृतीस चालना मिळत आहे. त्यामुळे मिठाई, चॉकलेट देण्याच्या गिफ्टचे प्रमाण वाढत आहे. विविध आकारांच्या खोक्यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात हे चॉकलेट बांधून दिले जात आहेत. चॉकलेटची चलती लक्षात घेऊन दुकांनामध्येही त्यांचीच रेलचेल दिसून येत आहे. काही बेकरीवाले घरातच चॉकलेट बनवत असून महिला बचत गटही चॉकलेट बनवत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chocolate as gift item gains popularity in diwali