कुटुंब समृद्धी बागेमुळे आपले घर व परिसर आकर्षक दिसतो. कुटुंबाचे आहार पोषण मूल्य सुधारते. जेवण रुचकर होते. शेतीच्या उत्पादनात चढउतार आले तरी कुटुंबाच्या आíथक स्थितीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही.
या बागेत घरात स्वतंत्र स्वयंपाकघर, स्नानघर व शौचालय व्यवस्था असावी. घरापासून थोडय़ा अंतरावर गोठा व गोबर गॅस संयंत्र उभारावे. शौचालयातील मला त्याला मिळेल अशी व्यवस्था करावी. हल्ली केवळ शेणापासूनच गॅस तयार होण्याची वाट पाहाण्याची गरज नाही. पुण्यातील एक तज्ज्ञ डॉ.आनंद कर्वे यांनी गवत, स्वयंपाकघरातील भाज्यांचे देठ, जेवणातील खरकटे वापरून गॅस तयार करण्याचे तंत्र संशोधित केले आहे. त्यावर आधारित संयंत्र बागेत बसवलं तर इंधनाची उत्तम सोय होईल. घरातील धूरही हद्दपार होईल. या संयंत्रामधील उर्वरित भागाचा खत म्हणुनही उपयोग करता येतो.
दुधासाठी ऐपतीनुसार व सांभाळण्याच्या कुवतीनुसार शेळी, गाय वा म्हैस घ्यावी. बागेचे क्षेत्र थोडे वाढवून या जनावरांसाठी बारमाही ओल्या चाऱ्याची व्यवस्था करावी. मधमाशी हा एक उपयुक्त किटक आहे. आधुनिक मधमाशी घरात राणीमाशीसह मधाचे पोळे ठेवले तर वर्षभर विनाखर्च मध मिळतो. सातपुडा माशीच्या दोन-तीन पेटय़ा अवश्य ठेवाव्यात.
मांसाहार करणाऱ्यांनी पाच ते दहा कोंबडय़ांचा बंदिस्त िपजरा ठेवला तर रोज ताजी अंडी मिळू शकतात. कोंबडय़ांशिवाय बदकेही पाळता येतात. घरच्या लोकांना नियमित मासे मिळण्यासाठी एखादा छोटा तलाव बांधून त्यात मासेपालन करता येते. घरबसल्या मासे मिळवता येतात. बंगालमधील शेतकरयांजवळ घराजवळच तलाव असतात. तेथून त्यांना रोज ताजी मासळी खाण्यासाठी मिळते. मोठय़ा तलावाऐवजी बागेत मर्यादित आकाराचे हौद बांधूनही गरजेपुरते मासे मिळवता येतील.
थोडी कल्पकता दाखवली, थोडी गुंतवणूक केली तर अशा समृद्धी बागेपासून दीर्घकालीन फायदा मिळवता येईल. आपले राहाणीमान समृद्ध व संपन्न बनवता येईल. घराजवळच अशी समृद्धी बाग तयार केली आणि कुटुंबातील सर्वच घटक यात सहभागी असतील तर कुटुंबियांना आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान मिळेल व त्या कुटुंबात साहजिकच समृद्धी येईल.
– प्र. बा. भोसले (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे देखे रवी..  – संस्कृत/विज्ञान आणि मराठी भाषा
मध्ये मुंबईत संस्कृतवर एक परिसंवाद झाला. दिवसभर होता. ज्या मंडळींनी तो घडवून आणला त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. प्रवाहाच्या विरुद्ध अशा गोष्टी घडवून आणणे सोपे नाही. आश्चर्य हे की ज्या सकाळच्या सत्राला मी गेलो त्या सत्राला रवींद्र नाटय़ मंदिराचे मुंबईतले सभागृह बऱ्यापैकी भरले होते. योजक: तत्र दुर्लभ: या वचनाप्रमाणे कोणी काही प्रयत्न केले तर लोक त्याला दाद देतात हे सिद्ध झाले. वक्ते मातबर होते. एक दाक्षिणात्य होता. त्याने पोटतिडकीने संस्कृतबद्दल इंग्रजीत व्याख्यान दिले. संस्कृतबद्दल बोलताना त्या विषयाच्या एका प्राध्यापकांनी संस्कृतला जसे आहे तसेच ठेवा. त्याची अपभ्रंश आणि अशुद्ध रूपांतरे करू नका असा विचार मांडला. संस्कृतच्या व्याकरणाचे नियम फार परिश्रमपूर्वक केलेले आहेत. आणि त्यात फेरफार करून मूळची भाषा बिघडण्यापलीकडे फारसे हाती लागणार नाही. असाही एक विचार मांडण्यात आला की, संस्कृत ह्य़ा भाषेवर अनेक भारतीय भाषा आधारित असल्या तरी आधुनिक जगात विशेषत: वैज्ञानिक जगात संस्कृतोद्भव भाषा वापरण्याचा हट्ट हा अनाठायी आहे आणि तो थोडाफार संकुचित आहे.
महाराष्ट्रात जे सतत घडते ते म्हणजे कोठल्याही गोष्टीला वर्ण वर्चस्वाचे आवरण असणे किंवा जातीयवादाचा वास असणे. ते तिथे घडले की काय, असे वाटण्याआधीच सकाळचे सत्र मला वाटते संपले. मुद्दा असा निघाला की जोवर आम्ही परकीयांच्या भाषेत शिकतो तोवर आपण पारतंत्र्याचे जोखड टाकू शकत नाही. त्यावर सूर असा उमटला की अंतर्गत वसाहतवाद हा ज्ञानभाषेच्या सहाय्याने अनेक शतके उच्चवर्णीयांनी संस्कृतच्या मार्फत केला आणि त्यातले तथाकथित ज्ञान जर इतके तुटपुंजे होते तर मग ही भाषा किंवा इतर त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या भाषा आधुनिक विज्ञानाला कशा काय पुऱ्या पडणार आहेत? हे मुद्दे जेव्हा चर्चेत उपस्थित झाले तेव्हा माझ्या मनात साधे साधे शब्द अवतरू लागले. Cover  वेष्टण,Back Cover  मलपृष्ठ, Library  ग्रंथालय, Orbit= कक्षा, Figure = आकृती, Customer = ग्राहक,  Electricity =   वीज, Computer =  संगणक,  Acid =  आम्ल, Magnet  = चुंबक, Diarrhoea = अतिसार, Pineapple = अननस, Administration =  प्रशासन, Mushroom = अळिंब, Cancer =  कर्करोग, Life Cycle = जीवनचक्र,  Mangrove = खारफुटी, Chromosomes = गुणसूत्र, Gland =  ग्रंथी, Pollution= प्रदूषण Station = = स्थानक अर्थात हे शब्द खऱ्या अर्थाने वैज्ञानिक नाहीत हा विचार मनात येतो ना येतो तोच व्यासपीठावरचे एक मान्यवर, वैद्यकीय विज्ञान देशी भाषेत सांगणे अवघड आहे की सोपे हे त्यांनाच विचारा असे म्हणाले आणि मला बोलावे लागले. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – सांसर्गिक रोग : आयुर्वेदीय उपचार – भाग- १
आत्ताच्या आधुनिक युगातील विविध आरोग्यअनारोग्य समस्यांमध्ये सांसर्गिक रोगाला खूप खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.  जबरदस्त जिद्दीचे थोरले माधवराव पेशवे यांचाही मृत्यू ‘क्षय’ या सांसर्गिक रोगाने झाला. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे, पाणी व अन्न यांच्या अटळ त्रुटींमुळे विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागतो. आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ श्री चरकसंहितेमध्ये विमानस्थान अ/ ३ ‘जनपदोध्वंस’ या अध्यायातही चरकाचार्यानी, त्या काळातील  सांसर्गिक रोगांबद्दल मोठी चिंता व्यक्त केली आहे. स्थलकालानुरूप, तुम्हाआम्हाला अनेक प्रकारच्या सांसर्गिक रोगांना तोंड द्यावे लागते. या लेखात फक्त पुढील रोग लक्षणांचा व त्यावरील उपयुक्त आयुर्वेदीय उपचारांचा विचार करत आहोत.
आग, उवा-लिखा, कावीळ, कोड, कंडू- खाज; कीटकदंश, खरुज, गोवर- कांजिण्या, गंडमाळा, खोकला, कफ; एचआयव्ही-एड्स, डोळे येणे, ताप, नागीण- धावरे, पोहण्याचे उप्रद्रव; फ्ल्यू, डेंग्यू, महारोग- कुष्ठरोग, राजयक्ष्मा- टीबी, हवेतील प्रदूषणाचे मानवी शरीरावर विविध परिणाम. या वीसचे आसपास सांसर्गिक रोग लक्षणांकरिता, आयुर्वेदीय औषधी उपचार महासागरात तुलनेने स्वस्त, करायला सोपी अशांची जंत्री पुढीलप्रमाणे  पोटात घेण्याकरिता, आरोग्यवर्धिनी, विविध गुग्गुळकल्प, प्रवाळ, कामदुधा, लघुसूतशेखर, मौक्तिक भस्म, लघुमालिनीवसंत, कुटजवटी, शमनवटी, आम्लपित्त टॅबलेट, प्रवाळपंचामृत, लक्ष्मीनारायण, दमागोळी, ज्वरांकुश, लवंगादिगुग्गुळ, अभ्रकमिश्रण, रजन्यादिवटी, एलादिवटी, त्रिफळा, रसायन, उपळसरीचूर्ण, अमरकंद, सुधाजल रक्तशुद्धीकाढा, महात्तिक्तधृत, शतावरीधृत महामंजिष्ठादिकाढा अशी औषधे आहेत. बाहय़ोपचारार्थ एलादितेल, करंजकर्पूर तेल, चंदन बलालाक्षादितेल, कंडू मलम, शतधौतघृत, हेमांगीचूर्ण, दशांगलेप, संगजीरेचूर्ण, चंदनगंध, ओवा, शेपा, वेखंड धुरीची औषधे; उपळसरी व त्रिफळाचूर्ण यांचा युक्तीने वापर तुरंत यश देतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २५ डिसेंबर
१९१४> विज्ञानलेखक डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म. निळे आकाश, अणुशक्ती शाप की वरदान, चला चंद्राकडे, अणूतून अनंताकडे, अग्निबाण  ही त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके!
१९४०> कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म. ‘पेरणी, मळणी, राखण, खोळंबा’ मिळून १५ कथासंग्रह. तसेच ‘पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती’ या कादंबऱ्या. ‘पिकलं पान, विहीर’ ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
१९५७> विपुल लेखन करणारे श्रीपाद महादेव माटे यांचे निधन.  त्या काळी अस्पृश्योद्धाराचे कार्य हाती घेऊन अस्पृष्टांचा प्रश्न, परशुरामचरित्र व पंचमानव हिंदुसमाज, भाषेच्या विकासाबद्दल रसवंतीची जन्मकथा, ही पुस्तके , तसेच काही चरित्रपुस्तके त्यांनी लिहिली. मात्र, उपेक्षितांचे अंतरंग, माणुसकीचा गहिवर या सामाजिक जाणिवेच्या कथालेखांमुळे माटे यांचे नाव मराठी साहित्याच्या इतिहासात घेतले जाते.
२००५> ज्येष्ठ वैदर्भीय कवी मनोहर महादेव देशपांडे यांचे निधन. विदर्भ साहित्य संघाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनोहर यांचे ‘वनफूल आणि अंतर्देशी’ हे काव्यसंग्रह प्रकाशित.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family wealth garden and living standards