वाहतूकदारांच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन शासनाने दिल्यामुळे वाहतूकदारांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य बाबा शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. ट्रान्सपोर्ट काँग्रेस व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. त्याला दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दर्शविला होता. थर्ड पार्टी विम्यातील दरवाढ, सातत्याने वाढत जाणारे डिझेलचे दर व त्यामुळे होणारे नुकसान, त्याचप्रमाणे टोलबाबत वाहतूकदारांच्या मागण्या आहेत. केंद्रीय पातळीवरील मागण्यांबाबत समितीची सथापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडील मागण्यांबाबत सोमवारी मुंबईत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूकदारांशी चर्चा केली. त्यात मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने बंदचा निर्णय मागे घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After govt assurance transporters strike closed