भक्ती बिसुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमं आणि त्यावरून पसरणाऱ्या गोष्टी अनेकदा नकारात्मक असल्याचं दिसतं. पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडणारं, त्याबद्दल बोलण्याची संधी देणारं माध्यम म्हणूनही समाजमाध्यमांवरून काम होताना दिसतं. ब्लॅक रोझ इंडिया हा असाच एक आश्वासक प्रयत्न आहे.

वेगवेगळय़ा वयोगटांतले, एकमेकांना प्रत्यक्षात अजिबात न ओळखणारे अनेक जण समाजमाध्यमांवर अतिशय मोकळेपणाने संवाद साधताना दिसतात, हे समाजमाध्यमांच्या वापराचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर असो की मोबाइलच्या प्ले स्टोअरवर रोज नव्याने दाखल होणारी अ‍ॅप्लिकेशन्स असो, संवाद साधण्यासाठी या पर्यायांचा वापर करताना समोरची व्यक्ती कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय आपलं म्हणणं ऐकून घेणार आहे ही आश्वासकता मनातल्या दुखऱ्या गोष्टींना वाट करून देण्यासाठी पुरेशी ठरते. नेमका हाच अनुभव आजच्या समाजमाध्यमांचा अविभाज्य भाग असलेल्या फेसबुकवर सुरू असलेल्या ‘ब्लॅक रोझ इंडिया’ या पेजच्या निमित्ताने येतो आणि समाजमाध्यमं ही आता केवळ वेळ घालवण्यासाठी राहिलेली नाहीत याची जाणीव होते.

समाजमाध्यमांवर ‘मी टू’ हे वादळ येऊन गेलं आणि त्यानंतर अनेक व्यक्ती आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलू लागल्या. लैंगिक अत्याचारांचा अनुभव उघडपणे बोलण्यासारखं वातावरण आजही आपल्या सभोवती नाही. त्यामुळे अडनिडय़ा वयात झालेल्या लैंगिक अत्याचाराचं ओझं घेऊन जगणारी असंख्य माणसं आपल्या आजूबाजूला वावरतात. ‘ब्लॅक रोझ इंडिया’ या पानाने अशा अनेक माणसांच्या दबलेल्या आवाजांना व्यासपीठ मिळवून दिलं आहे. अवघ्या काही महिन्यांमध्येच शेकडो जणांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या दुखऱ्या आठवणींना या व्यासपीठाद्वारे वाट करून दिली आहे. सुमारे चार हजार सदस्यांनी हे पेज ‘लाईक’ आणि ‘फॉलो’ करायला सुरुवात केली, त्यामध्ये महिला, पुरुष आणि समलैंगिकांचाही समावेश आहे. ब्लॅक रोझ इंडिया या पेजवर व्यक्त होणाऱ्या व्यक्तींचे अनुभव थेट त्यांच्या बालपणीच्या आठवणींमधून वर आले आहेत. सुमारे पन्नास टक्के  लैंगिक अत्याचारग्रस्तांवर झालेला अन्याय हा एक तर त्यांच्या बालपणी किंवा अडनिडय़ा (पौगंडावस्थेत) वयात झाला आहे.

रेणुका खोत आणि मुक्ता चैतन्य यांच्या पुढाकारातून हे पेज सुरू झालं. मुक्ता चैतन्य म्हणाल्या, अनेक वर्षांपासून समाजमाध्यमांवर सक्रिय राहून लेखन करताना लैंगिक अत्याचाराच्या नकोशा आठवणी सांगून मोकळं होणं ही अनेकांची गरज असल्याचं जाणवलं.   अशा सगळय़ा व्यक्तींना मोकळं होण्यासाठी एक व्यासपीठ तयार करायचा विचार होता. त्यासाठी फेसबुक पेज हा पर्याय परिणामकारक ठरेल असं रेणुकाने सुचवलं आणि तातडीने आम्ही ही कल्पना अमलात आणली. वैयक्तिक पातळीवर त्रासदायक ठरलेल्या लैंगिक अत्याचाराचे अनुभव आम्ही ई-मेलवर लिखित स्वरूपात मागवले. या आवाहनाला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद अशा व्यासपीठाची समाजाला असलेली गरज अधोरेखित करणारा ठरला.

खोत म्हणाल्या, लहानपणापासून आपल्याला एक सुरक्षित चौकट आखून दिली जाते. प्रत्यक्षात अनेक मुलामुलींवर या चौकटीच्या आतच लैंगिक अत्याचार होतात. कामाच्या ठिकाणी शोषण होतं. याबद्दल बोलायचं तर कोणतेही शिक्के न मारता ऐकून घेणाऱ्या व्यक्ती कमी असतात किंवा नसतातच. म्हणून हे व्यासपीठ सुरू केलं. या पानावर महिलांप्रमाणेच पुरुष आणि समलैंगिक व्यक्तींनीसुद्धा त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल मोकळेपणी लिहिलं. काही पुरुषांनी आपल्या हातून घडलेल्या लैंगिक अत्याचारांची अपराधी कबुली देणारं लेखनही केलं. ज्या गोष्टींबाबत उघडपणे बोलणं हे समाजात जवळजवळ अमान्य आहे अशा विषयावर बोलायचं धैर्य एकवटणारे काही जण पुढे आले, की त्यांच्या बरोबरीने आणखी काही अन्यायग्रस्त बोलायचं धाडस करतात. पोळलेल्या दुखऱ्या मनावर वाचक आणि सदस्यांकडून फुंकरही घातली जाते आणि आपण एकटे नाही ही जाणीव देते.

फेसबुक या समाजमाध्यमावर ‘ब्लॅक रोझ इंडिया’ या नावाने हे पान आहे. राइट टू ब्लॅक रोझ इंडिया अ‍ॅट जीमेल डॉट कॉम या पत्त्यावर स्वत:च्या अनुभवांबाबत कोणीही लेखन पाठवू शकते. लेखन करणाऱ्यांना हरकत नसेल तर ते लेखन त्यांच्या नावाने प्रसिद्ध केले जाते, पण त्यांची इच्छा नसल्यास त्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about write say be free