महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी चालवली जाणारी ‘विद्यानिकेतन’ बंद करण्याचा घाट शिक्षण मंडळाने घातला आहे. अभ्यासात विशेष प्रगती करून दाखवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांसाठीच्या या शाळांनी शिक्षण मंडळाच्या लौकिकात मोठी भर घातली आहे आणि या शाळांमध्ये शिकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढील जीवनातही लक्षणीय प्रगती केली आहे. तरीही सर्व विद्यानिकेतन बंद करण्याची प्रक्रिया मंडळात सध्या सुरू आहे.
महापालिका शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतात, ज्यांना अभ्यासात विशेष रुची असते आणि प्रयत्न केले तर जे विद्यार्थी भावी जीवनात उच्चशिक्षित होऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने ‘विद्यानिकेतन’ शाळा सुरू केल्या आहेत. हा प्रयोग १९७० मध्ये सुरू करण्यात आला आणि गेली चव्वेचाळीस वर्षे हा प्रयोग यशस्वी देखील ठरला आहे. तिसऱ्या इयत्तेची वार्षिक परीक्षा संपली की तिसरीतील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळातर्फे घेतली जाते आणि या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना चौथीसाठी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो. त्यासाठीचे निकष अतिशय कडक असून ते पाळलेही जातात. त्यामुळे ‘विद्यानिकेतन’मध्ये अभ्यासाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि त्यांना परीक्षांमध्ये तसेच अन्य सर्व शैक्षणिक बाबींमध्ये चांगले यशही मिळते.
मंडळाच्या या शाळा चौथी ते सातवी या वर्गासाठी असून सध्या एकोणीस विद्यानिकेतन चालवली जात आहेत. मात्र, या सर्व शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या महापालिका शाळेत पाठवण्याचा निर्णय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच, आगामी शैक्षणिक वर्षांपासून विद्यानिकेतन बंद करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत मंडळातील अधिकारी फक्त प्रशासकीय सोय म्हणून या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत.
 —
‘विद्यानिकेतन’ सातवीपर्यंत असल्यामुळे तेथील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची व्यवस्था अनेकदा होऊ शकत नाही, ही समस्या लक्षात घेऊन विद्यानिकेतनधील १५१ विद्यार्थी नगरसेवक अप्पा रेणुसे आणि विशाल तांबे यांनी दत्तक घेतले आहेत. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे.

विद्यानिकेतन बंद करण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक असून या शाळांमध्ये शिकून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवून सनदी अधिकारी झाले आहेत. अनेक विद्यार्थी उच्च स्थानावर पोहोचले आहेत. विद्यानिकेतन मधील सर्व विद्यार्थी पुढील जीवनात यशस्वी होतात असा अनुभव आहे. या शाळांमधील शिक्षकही अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि विद्यार्थ्यांसाठी भरपूर वेळ देतात, परिश्रम करतात. केंद्र शासनातर्फे नवोदय विद्यालये चालवली जातात. राज्य शासनाकडूनही विद्यानिकेतन चालवली जातात. अशी ही एक चांगली व्यवस्था आहे; पण पुण्यात मात्र या शाळाच बंद केल्या जात आहेत.
– अप्पा रेणुसे
नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc school student closed vidyaniketan